नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात ज्या मुलांनी आई, वडील गमावले, त्यांचे सर्वस्वच हिरावले आहे. केंद्र सरकार आणि सारा देश आता या मुलांचे सर्वस्व बनला आहे. बालक असताना पालक गमावणे हे आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान असते. आई, वडील तर आपण परत आणू शकत नाही; पण या मुलांच्या आयुष्याची वाट सुलभ तर करूच शकतो… ती आपण करणार आहोत, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने 'पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन' योजनेला सुरुवात केली असून, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोमवारी या योजनेचे कार्यान्वयन करण्यात आले. कार्यक्रमात मोदी यांनी अनाथ मुलांच्या बँक खात्यात 'पीएम केअर्स फंडा'तून मदत निधी पाठविला. मोदी यावेळी म्हणाले, कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना, अनाथ झालेल्या मुलांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. सरकार या मुलांच्या सोबत आहे.
अनाथ मुलांना शिक्षण, आरोग्य विमा अन् दहा लाख देणार
* चांगल्या शिक्षणासाठी या मुलांच्या घराजवळच सरकारी अथवा खासगी शाळेत प्रवेशाची सोय करण्यात आली आहे.
* एखाद्या मुलाला व्यावसायिक कोर्स किंवा उच्चशिक्षणासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर त्यासाठीही 'पीएम केअर्स फंड' मदत करेल.
* दैनंदिन गरजांसाठी मुलांना अन्य योजनांच्या माध्यमातून महिन्याला चार हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
* शिक्षणानंतर भविष्यासाठीही पैसा लागेल, याकरिता 18 ते 23 वयोगटातील युवकांना दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळेल.
* ही मुले 23 वर्षांची झाल्यानंतर त्यांना एकत्रितपणे दहा लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार आहे.
* या मुलांना 'आयुष्मान हेल्थ कार्ड' दिले जात आहे. यात 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातील.