बामणोली : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्या कास तलावाची उंची वाढवून त्याचे धरणात रूपांतर करण्यात आले. कासच्या सांडव्यावर जीवघेणा सेल्फी घेण्याचा प्रकार नुकताच निदर्शनास आला.
यावर्षी प्रथमच कास धरणामध्ये वाढीव पाणीसाठा करण्यात आला असून कास गावाच्या बाजूने सांडवा तयार करण्यात आला आहे. या सांडव्याला लोणावळ्याच्या भुशी डॅमचा फील देण्यात आला आहे. या सांडव्यावर पाच टप्प्यात पायर्यांचे काम होणार असून पहिल्या टप्प्यातील पायर्या पूर्ण झाल्या आहेत. येथे वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. सांडव्याच्या भिंतीबाहेरून रस्त्याकडेला प्लास्टिक कागदाची रिबीन बांधण्यात आलेली आहे. ही रिबीन हाताने बाजूला करून हौशी पर्यटक कपल्स सांडव्याच्या भिंतीवर उभे राहून धोकादायक स्थितीत सेल्फी काढत आहेत. हा सेल्फी जीवघेणा ठरू शकतो.
कारण सांडव्याची भिंत खूप उंच आहे. पाणी वाहणार्या ठिकाणी मोठमोठे जांभे दगड टाकण्यात आलेले आहेत. एखादा पर्यटक भिंतीवरून पाय घसरून आत पडला तर ते धोकादायक ठरु शकते. कास धरण भिंतीवरूनही काही पर्यटक चालत सांडव्याच्या बाजूला येत आहेत. सातारा पालिकेने येथे तत्काळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.