ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस काळ बदलत गेला. काळानुरूप हवामान खाते व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले. पूर्वीच्या काळी पक्ष्यांच्या हालचालींवरून व घरटी बांधण्यावरून पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
ग्रामीण भागात मात्र आजही पक्ष्यांची घरटी बांधण्यावरून पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. गावखेड्यात पक्ष्यांचे निरीक्षण करून सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज बांधला जातो.
जमिनीवर पाण्याच्या डबक्यात आंघोळ करणार्या चिमण्यांचे थवे, तोंडात भक्ष्य घेऊन जाणारी मुंग्यांची रांग यावरूनही पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. पावसाळ्यापूर्वी कावळा आपली घरटी बांधण्यासाठी गवत, काडी जमा करतो. इवल्याशा चोचीत काडी पकडून घरटे बांधण्याच्या ठिकाणी नेताना दिसतो. काडी डाव्या टोकाकडे धरून उचलली तर पाऊस वेळेवर पडणार, मधोमध काडी पकडली तर पाऊस येत असल्याचे संकेत मिळतो, असे वयोवृद्ध शेतकरी व जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.