मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मी एनसीबी चा एक कर्मचारी आहे. गेल्या दोन वर्षांपासून एनसीबीच्या मुंबई कार्यालयात कार्यरत आहे, असा परिचय देऊन हा निनावी अधिकारी आपल्या पत्रात एनसीबीच्या बनावट गुन्ह्यांचा तपशील देण्यास सुरुवात करतो. तो लिहितो, गेल्या वर्षी एनसीबी ला सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या ड्रग्ज अँगलची चौकशी सोपवण्यात आली.
महानिदेशक राकेश अस्थाना यांनी त्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्यांचे शिष्य कमल प्रीत सिंह (केपीएस) मल्होत्रा यांना त्यांनी एसआयटीचे प्रभारी म्हणून नेमले आणि सुशातसिंगच्या ड्रग्ज अँगलची चौकशी सोपवली.
अस्थाना यांनी वानखेडे, केपीएस मल्होत्रा यांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही प्रकारे बॉलीवूडच्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून केसेस बनविण्याचे आदेश दिले गेले. दोघांनीही अस्थानांच्या इच्छापूर्तीसाठी बॉलीवूडच्या कलाकारांना खोट्या केसेसमध्ये अडकवले.
बॉलीवूड कलाकारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. त्यातील हिस्सा अस्थाना यांनाही दिला. अभिनेत्री दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल या कलाकारांचा यात समावेश आहे. त्यांचे वकील अयाज खान याने ही संपूर्ण रक्कम गोळा केली.
अयाज खान आणि समीर वानखेडे हे मित्र असून अयाज कधीही वानखेडेंच्या कार्यालयात येऊ शकतो. तो वानखेडेंना बॉलीवूडकडून दरमहा हप्ते वसुली करून देतो. वानखेडेही कोणत्याही बॉलीवूडच्या कलाकारांना पकडतात आणि अयाज खान याला आपला वकील करायला सांगतात, असे या निनावी पत्रात म्हटले आहे.
वानखेडे यांनी खोट्या केसेस तयार करण्यासाठी आपली वेगळी टीमच तयार केली आहे. त्यात अधीक्षक विश्व विजय सिंह, आयओएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पीडी मोरे, विष्णू मीना, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय, अनिल माने आणि वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे, असेही हे पत्र सांगते.
चालक अनिल माने हे सर्व लोक कोणाच्याही घरी झडती घेताना ड्रग्ज ठेवतात. त्यानंतर खोट्या केसेस तयार करतात. त्यानंतर एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा केला जातो. वानखेडे काही लोकांकडून ड्रग्ज खरेदी करतो. दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद शेख, नासिर, आदिल उसमानी ही ती माणसे आहेत. ती फक्त वानखेडेंना ड्रग्ज आणून देतात. हे ड्रग्ज खरेदी करण्यासाठी वानखेडे सिक्रेट सर्व्हिस फंड आणि लोकांच्या घरी छापेमारी करताना सापडलेल्या पैशाचा वापर करतात, असा धक्कादायक दावा या पत्रात करण्यात आला आहे.