मुंबई : पुढारी वृत्तसेवा : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका बाईपायी देशाची फाळणी मान्य केली, देशाचा विश्वासघात केला, असा आरोप स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी शुक्रवारी केला. भारतातील तत्कालीन ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या पत्नी एडविना यांना नेहरू पुढे बारा वर्षे पंतप्रधान कार्यालयातील गोपनीय माहिती पत्राद्वारे देत राहिले. हा पत्रव्यवहार केंद्र सरकारने मागवावा आणि जाहीर करावा, अशी मागणीही सावरकर यांनी केली.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी रणजित सावरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. वि.दा. सावरकर यांनी आपल्या सुटकेसाठी कायद्यानुसार ब्रिटिशांकडे याचिका केल्या होत्या. यात त्यांनी आपल्या कार्याबद्दल माफी मागितली नव्हती. कायदेशीर तरतुदीनुसार पाठविलेल्या या याचिकेत त्यावेळी रूढ असलेला मावना लिहिला होता. अशाच आशयाचे मायने त्या काळात महात्मा गांधींनीही लिहिली होती, असे सांगत रणजित सावरकर यांनी विविध पत्रांचे मायने वाचून दाखविले.
मार्चच्या मध्यंतराला माऊंट बॅटन भारतात आले. भारताच्या फाळणीची योजना त्यांनी नेहरुंकडून व्यक्तिगतरित्या मंजुर करून घेतली. काँग्रेसकडून ऐन- वेळी दगाफटका व्हायला नको यासाठी त्यांनी नेहरूंसोबत शिमल्याला खासगी दौरा केला. त्यात लॉर्ड माऊंटबॅटन, लेडी माऊंट बॅटन, पामेला माऊंट बॅटन आणि नेहरू सहभागी झाले. त्या चार दिवसांत काय जादू झाली माहिती नाही, नेहरूंचा 'नर्व्हस ब्रेकडाऊन' संपला आणि पूर्ण काँग्रेसला अंधारात ठेवून फाळणीची योजना मान्य झाली. असेही सावरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी रणजित सावरकर यांनी बॅटन यांची मुलगी पामेला यांच्या पुस्तकाचा दाखला दिला. या पुस्तकात पामेला म्हणतात की, आम्ही १५ महिने भारतात राहिलो, त्यादरम्यान माझी आई आणि नेहरू यांच्यात आकर्षण आणि प्रेमाचे संबंध तयार झाले. माझ्या वडिलांना काही कामे करून घ्यायची असतील, तर ते आईला सांगायचे की, तू हे जवाहरकडून करून घे. तसेच, नेहरू रोज रात्री २ नंतर माझ्या आईला पत्र लिहायचे. त्याची सुरुवात आणि शेवट अत्यंत आकर्षक शब्दांत असायचा. मध्यल्या परिच्छेदांमध्ये त्यांनी दिवसभरात काय केले, कोणाकोणाला 'भेटले, त्याची रोजनिशी असायची. हे सतत १२ वर्षे सुरू होते. याचा अर्थ नेहरू १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटनला पाठवत होते. त्यांचे वारसदार राहुल गांधींनी याचे उत्तर द्यावे, असे सावरकर म्हणाले.