फलटण, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे फलटण तालुक्यातील बरड येथे दर्शन घेतले आणि माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले. यावेळी त्यांनी माऊलींच्या चरणी लीन होत भरपूर पाऊस पडू दे, बळीराजासह सगळी जनता सुखी राहुदे, असे साकडे घातले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पाच दिवसांच्या मुक्कामासाठी सातारा जिल्ह्यात आला आहे. लोणंद, तरडगाव व फलटण येथील मुक्कामानंतर हा सोहळा गुरुवारी बरड येथील मुक्कामी विसावला. दरम्यान, सातारा जिल्हा दौर्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी निंबळक नाका येथे माऊलींचे दर्शन घेतले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. प्रवीण दरेकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते. यावेळी ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सारथ्य करण्याची संधी मिळाली हा माझासाठी भाग्याचा दिवस आहे. पद कोणतेही असो माऊलींकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आहे. आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट माऊली पूर्ण करते, मी फक्त आशीर्वाद मागितला असल्याचे त्यांनी सांगितले.