मुंबई : पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वांत प्रतिष्ठित उद्योजक घराण्यांपैकी एक असलेल्या शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मभूषण पालोनजी मिस्त्री यांचे सोमवारी रात्री दक्षिण मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पाट्सी पेरिन डुबास व टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री, शापूर मिस्त्री ही मुले आणि लैला मिस्त्री, अलू मिस्त्री या दोन मुली असा परिवार आहे.
पालोनजी मिस्त्री यांच्यावर बुधवारी पारसी पद्धतीने दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शापूरजी पालोनजी हा उद्योग समूह टाटा समूहातील सर्वांत मोठा भागधारक आहे. पालोनजी समूहाकडे टाटाचे 18.37 टक्के शेअर्स आहेत. 1929 साली जन्मलेले पालोनजी यांनी शेवटपर्यंत आपल्या उद्योगाची धुरा वाहिली. सुरुवातीला बांधकाम क्षेत्रात असलेल्या या समूहाने केलेल्या बांधकामात भारतीय रिझर्व्ह बँक आणि एचएसबीसी बँकेच्या इमारतींचा समावेश आहे. नंतर हा समूह कापड उद्योग, जहाज बांधणी आणि घरगुती उपकरणांच्या व्यवसायात विस्तारला.
पालोनजींनी आयरिश महिलेशी लग्न केल्यानंतर त्यांना आयर्लंडचे नागरिकत्व मिळाले होते. ते आयर्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे स्थान
143 वे होते.
पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
पालोनजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पालोनजी यांनी वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. त्यांचा परिवार आणि मित्रांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असा शोक संदेश मोदी यांनी पाठवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शापूरजी पालोनजी यांना श्रद्धांजली वाहताना देशाच्या औद्योगिक क्षेत्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे, असे म्हटले आहे.
पालोनजी मिस्त्री यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीप पुरी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. बोम्मई आदींनी मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.