गुवाहाटी/हाफलाँग ; पीटीआय : आसाममध्ये 20 जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला असून जवळपास दोन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पावसामुळे राज्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाडी जिल्हा असलेल्या दिमा हासाओ येथे भूस्खलन होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे तर काचर येथे दोघांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत विविध जिल्ह्यांत 16 ठिकाणी पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विविध भागांत रस्ते, पूल आणि घरे यांचे अंशतः किंवा पूर्णतः नुकसान झाले आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे अनेक मार्ग, रेल्वेमार्ग बंद झाले आहेत. पूरस्थितीने राज्यातील एक लाख 97 हजार 248 नागरिकांना फटका बसला आहे.
यात होजाई जिल्ह्यातील सर्वाधिक 78 हजार 157 तर काचार जिल्ह्यातील 57 हजार 357 नागरिकांचा समावेश आहे. राज्य आपत्ती निवारण पथकाने ही माहिती दिली आहे. 20 जिल्ह्यातील एकूण 652 गावांना फटका बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती कृती दल आणि राज्य आपत्ती कृती दल तसेच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने पूरग्रस्त भागात मदतकार्यास सुरुवात केली आहे.
2800 प्रवाशांची सुटका
भूस्खलनामुळे रेल्वेमार्ग बंद झाल्याने लुमडिंग-बदारपूर भागात अडकलेल्या दोन रेल्वेंमधून 2800 प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. याशिवाय अनेक प्रवाशांना भारतीय हवाई दलाच्या मदतीने एअर लिफ्ट करून सुरक्षित स्थळी नेले गेले.
12 वितरण केंद्रांद्वारे मदत
सात जिल्ह्यांत 55 शिबिरांत 32 हजार 959 नागरिकांनी आश्रय घेतला आहे. याशिवाय 12 वितरण केंद्रांद्वारे पूरग्रस्तांना गरजू साहित्यांची मदत केली जात आहे.