दिसपूर, वृत्तसंस्था : मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या आदेशानंतर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये धडक कारवाई करताना 18 वर्षांखालील मुलींशी लग्ने करणार्या 1,800 हून अधिक नवर्यांना अटक केली आहे. शुक्रवारपासून ही कारवाई सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर अटकसत्र पोलिसांनी राबवले. आसाममध्ये बालविवाहाची 4 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
आसाम पोलिसांना महिलांवरील अक्षम्य आणि घृणास्पद गुन्ह्यांसाठी आरोपींना कठोरपणे वागवावे, असे निर्देश मी स्वत: दिले आहेत, असे सरमा यांनी सांगितले. बालविवाहाविरोधातही पोलिसांचे तसेच कठोर वर्तन असावे, ही अपेक्षा मला आहे. बालविवाहाची समस्या निव्वळ प्रबोधनाने संपणार नाही, असे लक्षात आल्यानेच या कारवाईची वेळ आली, असे ते म्हणाले. पोलिसांनी राज्यभरात आतापर्यंत 4,004 गुन्हे दाखल केले आहेत. येत्या काही दिवसांत आणखीही प्रकरणे समोर येतील.
महिला, बाल मृत्यूचे वाढते प्रमाण
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या अहवालानुसार, आसाममध्ये माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. अहवालानंतर आसाम सरकारने बालविवाहाविरोधात कारवाईचे आदेश दिले होते.
कुठे किती गुन्हे?
धुबरी जिल्ह्यात 370, होजईमध्ये 255 आणि उदलगुरीमध्ये 235 आणि मोरीगावमध्ये 224 गुन्हे दाखल झाले आहेत.
52 काझी-पुरोहितांना अटक
काझी आणि पुरोहित मिळून अशी लग्नेे लावणार्या 52 जणांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक डी. पी. सिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली.