ठाणे ; नरेंद्र राठोड : आयपीएलच्या रणधुमाळीदरम्यान मैदानाबाहेर खेळाडूंवर लागणारी बोली, प्रक्षेपणाचे हक्क, प्रायोजकत्व अशा बाबी कोट्यवधींच्या घरात मोजल्या जातात. संपूर्ण सट्टाबाजार ऑनलाईन झाला असून, प्रत्येक सामन्यावर 8 संकेतस्थळांवरून जगभरातून 300 ते 800 कोटींचा सट्टा घेतला जात आहे.
आयपीएलच्या या हंगामात 70 लढती असून, प्रत्येक सामना व प्रत्येक चेंडूवर जगभरातून काही सेकंदांत शेकडो कोटींचा डाव खेळला जात आहे. आयपीएलच्या सट्टा सिंडिकेटचा व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक महानगरात बुकींची साखळी कार्यरत आहे. सट्टाबाजारात तब्बल 21 हजार कोटींंची उलाढाल होईल, अशी शक्यता असली, तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त पैसा फिरत असल्याचा अंदाज मुंबईतील एका बुकीने व्यक्त केला.
यंदा 13 फेब्रुवारीला झालेल्या लिलावात 204 खेळाडूंवर 5 अब्ज 51 कोटी, 70 लाख रुपयांची बोली लागली. सामन्यांचे प्रक्षेपण हक्क 3 हजार 270 कोटी रुपयांना विकले गेलेे. मुख्य प्रायोजकत्वासाठी टाटा समूहाने 600 कोटी रुपये खर्च केले असून, याव्यतिरिक्त शेकडो कोटींचे प्रायोजक मिळाले आहेत. उल्हासनगरातील एक बुकी म्हणाला, प्रत्येक सामन्यावर 300 ते 800 कोटींचा सट्टा लागला आहे.
एखाद्या संघाचा भाव 1 रुपये 66 पैसे असेल व एखाद्याने 1 हजार रुपये लावले, तर जिंकल्यानंतर 1 हजार 660 रुपये मिळतात. जिंकण्याची शक्यता जास्त असलेल्या संघाचा भाव कमी असतो. यंदा चेन्नई सुपर किंग्जला सर्वांत कमी म्हणजे 1 रुपये 60 पैसे भाव मिळाला आहे. मुंबई इंडियन्सला 2 रुपये 6 पैसे, पंजाब किंग्जला 1 रुपये 83 पैसे, गुजरात टायटन्सला 2 रुपये 17 पैसे, सनरायझर्स हैदराबादला 2 रुपये 27 पैसे, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला 1 रुपये 88 पैसे, दिल्ली कॅपिटल्सला 1 रुपये 86 पैसे, लखनऊ सुपरजायंट्सला 2 रुपये 7 पैसे असे भाव मिळाल्याचे समजते.