त्रिनिदाद, वृत्तसंस्था : टी-20 क्रमावारीत नंबर 1 असलेल्या वेस्ट इंडिजने भारतीय संघाला पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने 4 धावांनी पराभूत केले. या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने आपल्या संघाची पाठराखण केली असून आपला संघ युवा संघ आहे आणि त्यांच्याकडून चुका होणारच. संपूर्ण सामन्यावर आम्ही पकड घेतली होती. जेव्हा आम्ही सलग दोन विकेटस् गमावल्या, ते आम्हाला महागात पडले, असे त्याने म्हटले आहे.
ब्रेंडन किंगने (28) विंडीजला चांगली सुरुवात करून दिली; परंतु विंडीजला 6 बाद 149 धावांपर्यंत मजल मारता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल (3) आणि इशान किशन (6) हे झटपट माघारी परतले. तिलक वर्मा (39) आणि सूर्यकुमार यादव (21) यांनी 39 धावांची भागीदारी केली; परंतु दोघेही 10 धावांच्या अंतराने तंबूत परतले. येथे सामना भारताच्या हातातून निसटला. अर्शदीप सिंगने सलग 2 चौकार खेचून मॅचमध्ये रोमांच आणला. 6 चेंडूंत 10 धावा हव्या असताना कुलदीप त्रिफळाचीत झाला. पण, भारत 4 धावांनी कमी पडला. अर्शदीप 12 (7 चेंडू) धावांवर रनआऊट झाला. 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 9 बाद 145 धावाच करता आल्या.
हार्दिक पंड्या म्हणाला…
आम्ही लक्ष्याचा योग्य पाठलाग करत होतो. पण, आम्ही काही चुका केल्या आणि त्याचा फटका बसला, ठीक आहे हे होत राहते. युवा संघ आहे आणि त्यांच्याकडून चुका होणारच. संपूर्ण सामन्यावर आम्ही पकड घेतली होती. माझा नेहमीच विश्वास आहे की, टी-20 क्रिकेटमध्ये जर तुम्ही विकेटस् गमावल्या, तर धावसंख्येचा पाठलाग करणे कठीण होते. जेव्हा आम्ही सलग दोन विकेटस् गमावल्या, ते आम्हाला महागात पडले. खेळपट्टीनुसारच आम्ही तीन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. यजुवेंद्र आणि कुलदीप यांनी सोबत खेळावे, अशी आमची इच्छा होती. अक्षर पटेलला फलंदाजीसाठी घेतले होते. मुकेश कुमार व तिलक वर्मा यांनी प्रभावी कामगिरी केली.
भारत, वेस्ट इंडिज संघाला स्लो ओव्हर रेटबद्दल दंड
वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा चार धावांनी पराभव करत रोमांचक विजय मिळवला, पण त्यांच्या संघानेही टीम इंडियासारखी मोठी चूक केली. त्यामुळे आयसीसीने कारवाईचा बडगा उचलत उभय संघांना शिक्षा केली आहे. टीम इंडियाने त्यांच्या गोलंदाजीदरम्यान निर्धारित वेळेच्या मर्यादेनंतर एक षटक टाकले. त्याचबरोबर विंडीजने संघानेही गोलंदाजी करताना निर्धारित वेळेच्या मर्यादेनंतर दोन षटके टाकली. अशाप्रकारे स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने दोन्ही संघांना दंड ठोठावला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या 5 टक्के कॅरेबियन संघाला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.