मुंबई : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांना जाज्वल्य अभिमान होता, त्यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्याला शब्दातून आणि कृतीतूनही चोख उत्तर देत. मात्र, ज्या सावरकरांबद्दल राहुल गांधी इतके नीच बोलतात, त्यांच्या गळ्यात गळा टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात, याचे वाईट वाटते. सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल, तर बाळासाहेबांशी नाते सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असून, एकाच दिवशी शिवसेनेच्या दोन्ही गटांत त्यावरून संघर्ष नको म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून 'वारसा विचारांचा' या परिसंवादाचे आयोजन बुधवारीच करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण करणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे गटाला मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व मंत्री, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे हेच खरा वारस
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, सावरकर आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे सूत्र एकच होते; पण उद्धव ठाकरे यांनी हे हिंदुत्वाचे विचारच सोडले. तुमचे- आमचे मतभेद झाले असतील, मान्य आहे. तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला शिव्या द्या. मात्र, सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल, तर बाळासाहेबांशी नाते सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही. जो विचाराचे नाते सांगेल तोच बाळासाहेबांचा खरा अनुयायी असेल. त्यामुळेच बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. रक्ताने
एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील; पण विचाराने एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत, असे फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यातील सर्व काँग्रेस नेत्यांचा मला प्रचंड आदर आहे; पण ज्या पद्धतीने सावरकरांनी अंदमानाच्या कोठडीत अकरा वर्षे अन्वनित अत्याचार सहन केले, तसे अत्याचार अन्य कोणत्या नेत्याने सहन केले, असा प्रश्न फडणवीस यांनी केला.
या अत्याचारातही सावरकरांनी स्वातंत्र्य लक्ष्मीची पूजा केली, तिचेच गीत गायले, असेही ते म्हणाले. सावरकरांपासून बाळासाहेबांपर्यंत हिंदुत्वाचा एकच धागा आहे. जातीभेद टाकून हिंदू म्हणून मजबूत होण्याची भूमिका सावरकरांनी मांडली. तरस बाळासाहेबांनी राजकारणात कधी जातीचे शस्त्र वापरले नाही. यांनी विरोधकांना लगावला.
सावरकरांना अपेक्षित हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व एकच होते, असेही फडणवीस म्हणाले. हिंदुहृदयसम्राट म्हणणेही त्यांना अडचणीचे वाटतेय- मुख्यमंत्री शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेताना देखील काही लोकांना आता कमीपणा वाटतो आहे. बाळासाहेबांचे नाव घेताना हिंदुहृदयसम्राट म्हणणे काही जणांना अडचणीचे वाटू लागले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली.. बाळासाहेबांनी एकदा भूमिका घेतली की ती ते कधीही बदलायचे नाहीत. बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणायचे आणि सत्तेसाठी तडजोड करायची हे आमच्या रक्तात नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. यंदा शिवप्रताप दिन साजरा झाला. तो कार्यक्रम मोठाच झाला, आपण केलेले सर्जिकलच… असे म्हणतानाच शेवटी धाडस लागते, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.