पुढारी ऑनलाईन डेस्क : नाणारमधील रिफायनरीला लोकांचा विरोध होता, म्हणून उद्धव ठाकरेंनी बारसूची जागा सुचवली होती. पत्र ठाकरेंनीच लिहिलं होतं. पण शिवसेना रिफायनरी विरोधकांच्या पाठीशी आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक लोकांशी चर्चा करावी, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत माती सर्वेक्षणाचे काम मंगळवारी दुपारपासून सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी बारसू येथील सड्यावर शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन केले. हा प्रकल्प उभारणारच असा निश्चय सत्ताधाऱ्यांकडू करण्यात आला आहे. विरोधक मात्र लोकभावनेच्या बाजूने असल्याचे सांगत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सूचवली होती. पण शिवसेना लोकभावनेच्या बाजूने आहे. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. उद्योग जगला तर कामगार जगेल. उदय सामंत यांनी स्थानिक लोकांसोबत चर्चा करावी, असे राऊत यांनी म्हटले आहे. राणेंनी कोणते प्रकल्प कोकणात आणले? फॉक्सकॉन प्रकल्प का गेला ते आधी सांगा? असे सवालही राऊत यांनी केले आहेत.
मोदींना पत्र देणारेच आंदोलन पेटवत आहेत, अशी टीका उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून केली आहे. बारसूबाबत शरद पवार यांची भेट घेणार असून यामध्ये कोणताही राजकीय उद्देश नाही. राज ठाकरेंनाही भेटणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.