Latest

आणखी दोन दिवस महाराष्ट्राला अवकाळीचा धोका; पुण्यासह 18 जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’

अमृता चौगुले

पुणे, नागपूर, नाशिक : टीम पुढारी; राज्यात अवकाळीचा दणका सुरूच असून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात आणखी दोन दिवस गारपीट सुरूच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कर्नाटक राज्य पार करून द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे; तर बांगला देशच्या ईशान्य भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या स्थितीचा प्रभाव वाढत आहे. याबरोबरच पश्चिम राजस्थान भागातही चक्रीय स्थिती कार्यरत आहे. या सर्व स्थितीमुळे उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर वाढला आहे.

अशीच स्थिती राज्यातील सर्व भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे. पुढील दोन दिवस, दि. 10 पर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात गारपीट होण्याची जास्त शक्यता आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात मध्य आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे.

पुण्यासह 18 जिल्ह्यांत 'यलो अलर्ट'
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, सोलापूर, धाराशिव.

SCROLL FOR NEXT