Latest

Winter Session of Parliament: तीन राज्यांमधील पराभवाचा राग सभागृहात काढू नका : PM मोदींचा विराेधकांना टोला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा व्हावी. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे. विरोधी पक्षांनी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये, असा टोला आज (दि.४) पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विरोधी पक्षांना लगावला. (Winter Session of Parliament)

लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभांचा निकाल काल हाती आला.  आज संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी माध्‍यमांशी बाेलताना पंतप्रधान नरेंद्र माेदी म्‍हणाले की, देशाने नकारात्मकता नाकारली आहे, त्यामुळे विरोधी पक्षाने सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला सकारात्मकतेने सामोरे जावे, असे आवाहनही त्‍यांनी केले. (Winter Session of Parliament)

तर देशाची दिशा बदलेल- मोदींचा विरोधकांना सल्ला

यावेळी पीएम मोदी म्हणाले, सध्याच्या निवडणूक निकालांच्या आधारे म्हटले तर विरोधी पक्षात बसलेल्या मित्रांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षाने पराभवाचा राग काढण्याचे नियोजन करण्याऐवजी या पराभवातून धडा घेत पुढे जावे. गेल्या ९ वर्षातील नकारात्मकतेचा कल सोडून सकारात्मकतेने या अधिवेशनात पुढे गेले तर देशाची दिशा बदलेल, असेही पीएम मोदी म्हणाले.

चार राज्यातील निकाल  उत्साहवर्धक

कालच चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले आहेत. हे अतिशय उत्साहवर्धक निकाल आले आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे कल्याण आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी समर्पित असलेल्यांसाठी चार राज्यातील निवडणुक निकाल प्रोत्साहन देणारे असल्याचेही पीएम मोदी यांनी संसदेला संबोधित करताना म्हटले आहे. (Winter Session of Parliament)

'या' तत्त्वांवर चालणाऱ्याला जनतेचा पाठींबा मिळतो

देशातील सर्व समाज आणि गटातील महिला, युवक, शेतकरी आणि माझ्या देशातील गरीब अशा चार जाती आहेत. ज्यांचे सक्षमीकरण आणि त्यांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आणि शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहचण्याच्या आधारित तत्त्वांवर जो चालतो, त्यांना खूप पाठिंबा मिळतो, असे देखील पीएम मोदी यांनी स्पष्ट केले.

विधेयके मांडली जातील त्यावर सखोल चर्चा करावी

संसद हे लोकशाहीचे  मंदिर लोकांच्या आशा-आकांक्षांसाठी आणि विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे संसद अधिवेशनाच्या सत्राच्या सुरुवातीलाच आम्ही विरोधी पक्षांशी सत्ताधाऱ्यांशी चर्चेची खात्री करतो. तसेच आम्ही नेहमीच सर्वांच्या सहकार्याची विनंती करतो आणि अपेक्षा करतो. मी सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त तयारी करून यावे आणि सभागृहात जी काही विधेयके मांडली जातील त्यावर सखोल चर्चा करावी, असेही पीएम यांनी संसद हिवाळी अधिवेशनादरम्यान म्हटले आहे. (Winter Session of Parliament)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT