नवी दिल्ली : सध्याच्या युगात प्रत्येकाचं आयुष्य हे खूप धावपळीचं, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारं बनले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मॉर्निंक वॉक असो की व्यायाम असो, ऑफिसला जाण्यासाठी- घरी येण्यासाठी, ट्रेन, बस पकडण्यासाठी प्रत्येक काम वेळेनुसार ठरवलं जातं. दिवसातले चोवीस तास माणूस घड्याळ्याच्या काट्यावर अवलंबून असतो. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल घड्याळ्यांची क्रेझ आहे. पण, डिजिटल असो की स्पोर्टस् वॉच असो बहुतांश लोकं घड्याळ डाव्या हातावरच बांधतात; पण तुम्ही कधी विचार केला आहे का, घड्याळ डाव्या मनगटावरच का बांधलं जातं.
एका सर्वेक्षणानुसार जगात डाव्या हाताने काम करणार्या लोकांची संख्या 10 ते 12 टक्के इतकी आहे. म्हणजे जवळपास 90 टक्के लोकं उजव्या हातानेच काम करतात. अशात उजव्या हाताने काम करताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून डाव्या हातावर घड्याळ बांधण्याची प्रथा रूढ झाली. शिवाय काम करताना डाव्या हाताचा वापर कमी होत असल्याने घड्याळ सुरक्षितही राहातं. त्यामुळेच घड्याळ बनवणार्या कंपन्या डाव्या हातावर बांधलं जातं हा विचार करूनच घड्याळ्याची रचना करतात.
पुरातन काळात घड्याळ खिशात ठेवली जात होती. त्याकाळातल्या अधिकारी वर्गात घड्याळ खिशात ठेवणं मानाचं मानत होते; पण ही झाली सामान्य गोष्ट, यामागे शास्त्रीय कारणही आहे. टेबल क्लॉक किंवा भिंतीवर लावलं जाणार्या घड्याळ्यात 12 हा अंक वरच्या दिशेला असतो. चोवीस तासांच्या दिवसात बारा वाजल्यापासून वेळ सुरू होते. हा विचार करूनच हातावरची घड्याळंही बनवली जातात. म्हणजे घड्याळ डाव्या हातावर बांधल्यावर बारा हा अंक योग्य प्रकारे वरच्या दिशेला असतो. तसेच त्याला चावी देणेही सोयीचे होते.