नवी दिल्ली : जंकफूड हे आरोग्यासाठी हानिकारक असते हे ठावूक असूनही अनेक लोक त्याचे वारंवार सेवन करीत असतात. सतत जंकफूड खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व अन्य गंभीर समस्यांचा धोका संभवतो. असे जंकफूड खाण्याची लोकांना का इच्छा होते हे संशोधकांनी पाहिले आहे.
संशोधकांच्या मते, जर आपली झोप पूर्ण होत नसेल तर जंकफूड खाण्याची इच्छा वाढू शकते. तणावपूर्ण स्थितीत शरीरात कार्टिसोल नावाचे हार्मोन उत्सर्जित होते. अशावेळी गोड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याचीही इच्छा वाढते. एका संशोधनात आढळले आहे की साखरेमुळे कार्टिसोलचा स्तर कमी होतो व मेंदूतील तणावाचे संकेत शांत होतात. काही वेळा काही हार्मोन्स आपल्या शरीरात 'अराजकता' निर्माण करतात. लेप्टीन व सेरोटोनिनसारखे हार्मोन आतडे व मेंदूमधील समन्वय करीत असतात. त्यांच्यामुळे काही वेळातच जंकफूडची तीव्र लालसा निर्माण होऊ शकते. भरभर खाण्याच्या सवयीमुळे आतड्यांपासून मेंदूपर्यंत संकेत चांगल्याप्रकारे पोहोचत नाहीत. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटत नाही व माणूस गरजेपेक्षा अधिक खातो!