वॉशिंग्टन : एस्ट्राजेनेकाचे प्रमुख पास्कल सोरियट यांनी इशारा दिला आहे की, वजन घटवणार्या काही लोकप्रिय औषधांच्या वापराने रुग्णांच्या शरीरातील स्नायू आकुंचित होण्याचाही धोका संभवतो. सध्या अनेक लोक अशा औषधांचा वापर करीत असतात.
टेलिग्राफमधील एका रिपोर्टनुसार, सोरियट यांनी रुग्णांना हा इशारा देत असतानाच कंपन्यांनाही चरबीला अधिक आणि स्नायूंना कमी लक्ष्य बनवणार्या औषधांची निर्मिती करण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, एखाद्याचे वजन कमी झाले म्हणजे त्याचा अर्थ त्याच्या चरबीबरोबरच स्नायूही कमी झाले असा होऊ शकतो. शिवाय, अनेक उपचारांबाबत ही समस्या आहे की, उपचार थांबले की, वजन पुन्हा वाढू लागते.
याचे कारण म्हणजे लठ्ठपणा हा एखाद्या जुनाट आजारासारखाच असतो. बहुतांश लोक औषधे घेणे बंंद करतात आणि लठ्ठपणा पुन्हा येतो. तोपर्यंत त्यांच्या स्नायूंचेही नुकसान झालेले असते. त्यांनी फार्मा कंपन्यांना वजन घटवण्याच्या औषधांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासही सांगितले, जेणेकरून त्यांचा प्रभाव दीर्घकाळ राहील आणि चरबीच्या हानीवरच अधिक केंद्रित असेल. सध्या जगभरात लठ्ठपणावरील उपचारातील औषधांची मागणी वाढली आहे. आगामी काही वर्षांमध्ये हा उद्योग 90 अब्ज डॉलरचा होण्याची शक्यता आहे.