मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४ हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि दोन ठिकाणी गळती दुरुस्त करणे आदी कामांसाठी सोमवार ३० जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत अर्ध्या मुंबईत पाणीबाणी असणार आहे.
मुंबईत अधूनमधून जलवाहिनी दुरुस्ती, झडपा बसवणे व अन्य कामे करण्यासाठी पाणी कपात करावी लागते. सोमवारपासून भांडुप संकुल येथे विविध कामे पालिकेने हाती घेतली आहेत. सोमवार ३० जानेवारी सकाळी १० वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार ३१ जानेवारी सकाळी १० वाजेपर्यंत पालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर २ विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.
पश्चिम उपनगरातील अंधेरी के पूर्व, अंधेरी के पश्चिम, गोरेगाव पी दक्षिण, मालाड पी उत्तर, कांदिवली आर दक्षिण, बोरिवली आर मध्य, दहिसर आर उत्तर, सांताक्रुझ एच पूर्व आणि बांद्रा एच पश्चिम या ९ विभागांमधील तर पूर्व उपनगरातील भांडुप एस विभाग, घाटकोपर एन विभाग आणि कुर्ला एल विभागातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडीत असणार आहे.
दादर जी उत्तर आणि वरळी जी दक्षिण या दोन विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो. त्याभागात ३० जानेवारीला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. या कामांमुळे २९ जानेवारी व ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान या विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.