कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गळतीच्या नावावर दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातील सात टीएमसी पाणी कर्नाटकला सोडून दिल्याचा आरोप आ. हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. हे पाणी शिल्लक असते तर कोल्हापूरला टंचाईच्या झळा बसल्या नसत्या. आताच्या पाणीटंचाईला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे सांगत जलसंपदा विभागाने कोल्हापूरची वाट लावल्याचे ते म्हणाले.
काळम्मावाडीची गळती काढण्याचा आराखडा नाही. निधी नाही तसेच यावर्षी पाऊस लांबणार आहे, याची चर्चा सुरू असताना पाणी सोडण्याची घाई का, असेही ते म्हणाले.
एसटी बस भरून माणसे आणून 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम केला, ही धूळफेक असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी 'शासन आपल्या दारी आणि येथे प्यायला पाणी नाही', अशी जिल्ह्याची अवस्था झाल्याचा टोला लगावला.
आंबेओहळचे पाणी कर्नाटकात
चित्री धरणात पाणी कमी पडते म्हणून आंबेओहळ प्रकल्पात साठलेले पाणी सोडून कर्नाटकला दिल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
'त्या' अधिकार्यांच्या चौकशीची मागणी
एक दिवसाआड पाणी अशी परिस्थिती कोल्हापुरात आली, त्याला जलसंपदा विभागच जबाबदार आहे. दूधगंगा व वेदगंगा नदी, त्याचे दोन्ही कालवे, गैबी बोगदा कोरडे पडत आहेत. धरणात केवळ एक ते दीड टीएमसी पाणी आहे. पाऊस आणखी आठ-दहा दिवस लांबला तर परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा देत त्यांनी पालकमंत्र्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. उपसाबंदीने आपल्याकडे पिके करपत असताना कर्नाटकात मुबलक उपसा सुरू आहे. याला जबाबदार असणार्या अधिकार्यांची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.