कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेने (ठाकरे गट) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एक जागा हवी होती, ती त्यांनी घेतली आहे. मग आता सांगलीचा हट्ट कशासाठी, असा सवाल काँग्रेस नेते, आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे.
डॉ. विश्वजित म्हणाले, शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात जी जागा हवी होती ती आता त्यांना मिळाली आहे. कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीची राज्यपातळीवर चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराजांचे नाव चर्चेला आले. शाहू महाराजांची प्रतिमा चांगली आहे. त्यांच्याबद्दल समाजमनात खूप आदराचे स्थान आहे. ते जो पक्ष निवडतील त्यांचा सन्मान ठेवावा, असे ठरले होते. त्यानुसार त्यांनी काँग्रेस निवडला. त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली या विषयाला काही लॉजिक नाही. असे काही ठरले नव्हते. या जागेबाबत त्यावेळी कुठेही अदलाबदलाची चर्चा झाली नव्हती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना त्याची कल्पना होती. पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला जागा हवी होती. आता तुम्ही हातकणंगलेची जागा घेतली आहे. मशाल चिन्हावर तुम्ही लढत आहात. सत्यजित पाटील उमेदवार आहेत. मग आता पुन्हा सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट नको आहे.
पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ज्याची जिथे ताकद आहे, नेटवर्क आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद आहे, तेथे त्या पक्षाने लढावे, असे अपेक्षित आहे. त्याअर्थाने सांगली आमची हक्काची जागा आहे. ज्या सांगलीत मी काम करतो, तेथे आग्रही राहणे माझी जबाबदारी आहे. आमचाच प्रश्न सुटत नसेल तर काँग्रेसच्या बैठकीला का जायचे?
सांगलीबाबत नेमके काय राजकारण शिजते आहे याची मला माहिती नाही आणि मला त्यात पडायचे नाही. निवडणुकीला केवळ एक महिना राहिला आहे. मला भाजपच्या ऑफरबाबत बातम्या पेरल्या जातात, त्यात मला पडायचे नाही. जे आमचे राज्यातील, दिल्लीतील नेते ठरवतील, महाविकास आघाडीचे जे ठरेल, त्यानुसार काम करू. शिवसेनेने त्यांचे उमेदवार जाहीर केले असले तरी, महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांना अजून दिशा नाही. भाजप उमेदवार जाहीर झालेत, त्यांनी आघाडी घेतली. आमचा निर्णय लवकर झाला पाहिजे.