पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी स्फोटक फलंदाज विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळणारी पेन्शन ही एकमेव त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. कोरोनाचाही त्याला फटका बसला आहे. मिळणारी पेंशन तुटपुंजी असल्याने कांबळी (Vinod Kambli) क्रिकेटशी संबंधित कामाच्या शोधात आहे. याबाबत कांबळी यांनी म्हटले आहे की, मुंबई क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. या खेळासाठी मी आयुष्यभर ऋणी आहे. निवृत्तीनंतर तुमच्यासाठी क्रिकेट नाही. पण जर तुम्हाला जीवनात स्थिर राहायचे असेल, तर तुमच्याकडे काम असणे महत्त्वाचे आहे. मी ते एमसीएकडून मिळवू इच्छुतो. याबाबत एमसीएचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, सचिव संजय नाईक यांना विनंती केली आहे.
50 वर्षीय विनोद कांबळी क्रिकेटशी संबंधित कामाच्या शोधत आहे. 2019 मधील T20 मुंबई लीग दरम्यान एका संघाचा तो प्रशिक्षक होता. त्यालाही कोविडमुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका बसला. बीसीसीआयकडून कांबळीला मिळणाऱ्या ३० हजार रुपयांच्या पेंशनवर अवलंबून राहावे लागत आहे. कांबळी नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमध्ये युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी जात होता. मात्र, नेरूळचा प्रवास खूप दूरचा आहे. याबाबत कांबळी यांनी सांगितले की, मी पहाटे 5 वाजता उठून कॅबने डीवाय पाटील स्टेडियमला जात असे. त्यानंतर मी संध्याकाळी बीकेसी मैदानावर युवा खेळाडुंना कोच करण्यासाठी येत असे. हे काम खूपच वेळखाऊ होते. मी एक निवृत्त क्रिकेटर आहे, जो पूर्णपणे बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे. सध्या माझे एकमेव उत्पन्नाचे स्त्रोत बोर्डाकडून मिळणारी पेन्शन आहे.
मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मदत मागितली होती. मी क्रिकेट सुधारणा समितीमध्येही होतो. पण ते एक मानाचे काम होते. मी एमसीएकडे काही मदतीसाठी गेलो होतो. माझी काळजी घेण्यासाठी एक कुटुंब आहे. एमसीएला अनेकवेळा सांगितले की, जर तुम्हाला माझी गरज असेल, तर मी वानखेडे स्टेडियमवर किंवा बीकेसीमध्ये उपलब्ध असेल.
बालपणीचा मित्र आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे का? असे विचारले असता कांबळी म्हणाला की, सचिनला सर्व काही माहीत आहे. पण मला त्याच्याकडून काहीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमध्ये काम करण्याची संधी दिली. तो खूप चांगला मित्र आहे. त्यांने नेहमीच माझ्यासाठी खूप काही केले आहे.
मुंबई संघाला माझी गरज भासल्यास मी उपलब्ध असेल. कारण मला कामाची गरज आहे. मला तरुणांसोबत काम करायचे आहे. मला माहित आहे की मुंबईने अमोल मुझुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. परंतु कुठेही माझी गरज भासली. तर मी तयार असल्याचे कांबळी यांनी सांगितले. दरम्यान, कांबळीने 104 एकदिवसीय आणि 17 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 1991 ते 2000 दरम्यान चार कसोटी शतके आणि दोन एकदिवसीय शतकांसह एकूण 3561 धावा केल्या आहेत.
हेही वाचलंत का ?