'युद्धस्यः कथा रम्यः' असे कितीही म्हटले, तरी युद्धाच्या कथा रम्य नसतात. युद्धाच्या असल्याच तर व्यथा असतात; पण भारतीय लष्कराने लढलेले एक युद्ध असे आहे की, त्याचा शेवट रम्य झाला होता. त्यातही हे महत्त्वाचे की, भारताने ते युद्ध भारतीय भूमीसाठी लढलेले नव्हते, तर मानवी हक्कांची पायमल्ली करून, जो वंशविच्छेद शेजारच्या देशात चालला होता, तो रोखण्यासाठी लढलेले ते युद्ध होते. ते युद्ध म्हणजे भारत-पाकिस्तानमधला 1971 बांगला देश मुक्तीसंग्राम ( Vijay Diwas 2021 ) . आज त्या मुक्तीसंग्रामाचा सुवर्ण महोत्सव. बरोबर 50 वर्षांपूर्वी 91 हजार पाक सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले. पाकिस्तानी जनरल अमीर अब्दुल ऊर्फ ए. ए. खान नियाझी याने भारतीय लष्करी अधिकार्यांसमोर शरणागती करारावर सह्या केल्या आणि तोपर्यंत पूर्व पाकिस्तान या नावे ओळखला जाणारा पाकिस्तानचा पूर्वेकडचा प्रांत पाकिस्तानपासून अलग होऊन स्वतंत्र बांगला देश बनला! आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या सैन्याने शेजार्यांच्या म्हणजे बांगला देशींच्या मदतीला धावून जात त्यांना मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय, हा खरे तर दुग्धशर्करा योग. 'वसुधैव कुटुंबकम्' अर्थात् हे विश्वची माझे घर ही संकल्पना अंगी बाणवलेल्या आपल्या देशाने शेजार्यांच्या मदतीला धावून जाणे आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहून विजय मिळवणे हे इतिहासातलेही दुर्मीळ उदाहरण. देशांच्या भौगोलिक सीमांपेक्षा मानवी हक्क महत्त्वाचे आहेत, हे जगाला फक्तच शब्दांनी न सांगता त्या हक्कांसाठी स्वतःचे रक्त सांडणार्या आपल्या कणखर धोरणाचा आणि ते धोरण मूर्त स्वरूपात आणणार्या आपल्या लष्कराचा म्हणूनच गौरव झाला पाहिजे. तसा तो होतोही आहे. गेले वर्षभर दिल्लीतल्या अमर जवान स्मारकापासून निघालेली ज्योत आपल्या लष्कराची जी वेगवेगळी बटालियन्स आहेत, त्या बटालियन्सच्या मुख्यालयांना भेट देत आहे आणि त्यानिमित्ताने बांगला मुक्ती लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या, सहभागी झालेल्या यौद्ध्यांचा सन्मान केला जात आहे. सध्या भारत-चीन वादाने पुन्हा उचल खाल्लेली असताना लष्कराचे मनोबल आणि देशवासीयांची लष्कराप्रती आत्मियता वाढवण्यासाठी हा दिवस सहायक ठरेल. दि. 16 डिसेंबर 1971 रोजी प्रत्यक्ष युद्धबंदी होऊन पाक लष्कराने शरणागती पत्करली ( Vijay Diwas 2021 ). हा इतिहास ज्ञात आहेच; पण फक्त 13 दिवसांत आपल्या लष्कराने हे साध्य केले, हा अजोड पराक्रम आहे. मात्र, त्याचे तितकेसे स्मरण नाही. पाकिस्तानाच भाग राहिलेल्या बांगला देशाची तेव्हाची लोकसंख्या मूळ पाकिस्तानपेक्षा जास्त होती, हाही विस्मृतीत गेलेला इतिहास. मुळात बांगला देशाच्या अलगीकरणाची मुळे भाषेच्या वादातून पेरली गेली होती; पण ते केले गेले पाहिजे. कारण, सात कोटी बांगला देशी जनतेची रोजच्या व्यवहाराची भाषा बंगाली असताना त्यांच्यावर उर्दू लादली गेली.