पुढारी ऑनलाइन डेस्क : US-India Relationship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारताबद्दल मोठे वक्तव्य समोर आले आहे. भारतातील अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी यांनी मंगळवारी याबाबत सांगितले. गार्सेटी म्हणाले, की राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी त्यांना सांगितले होते की भारत त्यांच्यासाठी जगातील एक महत्वपूर्ण देश आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी…
भारतातील अमेरिकेचे राजदूत, गार्सेटी यांनी मंगळवारी सांगितले की, मी जेव्हा इथे सेवेत रुजू झालो तेव्हा बायडेन यांनी त्यांना सांगितले की, भारत हा माझ्यासाठी जगातील सर्वात महत्वपूर्ण देश आहे. मी भारताबद्दल असा काही विचार करतो की दोन्ही देशांच्या इतिहासात आजपर्यंत कधीही कोणत्याही अमेरिकी राष्ट्रपतीने केलेला नाही. अमेरिकेत सहा टक्के करदाता भारतीय अमेरिकी आहेत.
ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञानापासून व्यवसायापर्यंत, पर्यावरणापासून महिला सक्षमीकरणापर्यंत, लघुउद्योगांपासून ते अवकाशापर्यंत, आम्ही आकाश ही मर्यादा म्हणत होतो; पण आता आम्ही अवकाशात एकत्र काम करत आहोत. त्यामुळे आता तर अगदी आकाश ही देखील मर्यादा नाही. समुद्राच्या तळापासून आकाशापर्यंत, अमेरिका आणि भारत हे चांगल्यासाठी एक शक्ती आहेत आणि या जगाला पुढे नेण्यासाठी एक शक्तिशाली शक्ती आहेत.
भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून यांनी नुकतेच 100 दिवस पूर्ण केले आहे. यावेळी त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पोस्ट केल्या. त्यात ते म्हणाले की, भारतातील यूएस राजदूत म्हणून 100 अविश्वसनीय दिवस साजरे करत आहे! माझ्या पहिल्या 100 दिवसांमध्ये, मी 12 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली, 200 हून अधिक स्वादिष्ट भारतीय पदार्थ चाखले आहेत. तसेच अतिशय अद्भूत लोकांना मी भेटलो आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की या सखोल मैत्री आणि प्रेमळ स्वागताबद्दल धन्यवाद. माझ्या कार्यकाळात मी भारत अमेरिका संबंध अधिक उंचावण्यास मी उत्सुक आहे!
गार्सेटी यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील एक आठवण देखील येथे सांगितली आहे. ते म्हणाले की, बोधगयामध्ये राहण्यासाठी आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांना त्यांच्या विद्यार्थीदशेत भारतात यायचे होते. मात्र, राजकारणामुळे ते शक्य झाले नाही. त्यांची विद्यार्थी परिषदेवर निवड झाली आणि त्यांनी सेवा करण्याचे वचन दिले. त्यामुळे त्यांनी असा विचार केला होता की त्यांचे भारतात येण्याचे स्वप्न मरण पावले आहे. पण विश्व अद्भूत आहे. त्याच्याकडे स्वप्नांना जोडण्याचा विचित्र मार्ग आहे आणि आता अचानक ते ते स्वप्न जगत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी भारतीय राज्यांच्या दौऱ्याची आणि भेटलेल्या लोकांची झलक शेअर केली आहे. या व्हिडिओत त्यांनी त्यांच्या देशाचे आभारही मानले आहेत. ते म्हणाले की, मला इथे राजदूत म्हणून स्वीकारल्याबद्दल आणि माझा वेळ इतका स्वागतार्ह आणि उपयुक्त बनवल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले आहे.
हे ही वाचा :