पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राच्या तुलनेत जलजीवन मिशनची कामे इतर राज्यांनी खूप चांगली केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कामांना ब्रेक लागला. जनतेपर्यंत पाणी पोहचू दिले नाही. त्या सरकारमधील नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले. पुण्यात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पटेल बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे, भीमराव तापकीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पटेल म्हणाले, देशात २०१९ मध्ये जलजीवन मिशनला सुरुवात झाली. जलजीवन मिशन योजना सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रापेक्षा काम कमी असलेल्या तेलंगणा, हरियाणा आणि गोवा राज्याने महाराष्ट्रापेक्षा चांगले काम करून जल जीवनमध्ये आघाडी घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगले काम झालेले नाही. केंद्राने कोणताही भेदभाव न करता सर्व राज्यांना जल जीवन मिशनसाठी निधी दिला. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, त्यामुळे निधी देऊनही कामाला गती या सरकारने दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यास तत्कालीन सरकार जबाबदार असल्याने त्यावेळच्या नेत्यांनी जनेतची माफी मागावी. दरम्यान, 2024 मध्ये पुन्हा भाजप बहुमताने सत्तेवर येईल आणि त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दोन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. मला विकास दिसला नाही मात्र नागरिकांमध्ये भीती दिसली, असा आरोपही पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, राजकारणातील त्यांची उंची बघता मी त्यांना साहेबच म्हणेल, परंतु त्यांनी एकही सहकारी संस्था उभी केल्याचे माझ्या माहितीत नाही, असा आरोप देखील पटेल यांनी यावेळी केला.