पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोरामच्या ऐझॉलमध्ये बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सायरंग परिसरात घडली आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनीही या दुर्घटनेवर ट्विट केले आहे. त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु असताना परिसरात ३५ ते ४० जण होते. हे सर्व लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना आज ( दि. २३ ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ऐजॉलपासून २१ किमी अंतरावर घडली. आतापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यांचा शोध सुरु आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची यांनी सांगितले की, रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनीही या घटनेबाबत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. त्याचबरोबर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.