Latest

Uddhav Thackeray : प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करा : उद्धव ठाकरे

Sonali Jadhav

नाशिक :पुढारी वृत्तसेवा,  प्रभू श्रीराम हे कुणा एका पक्षाची मालमत्ता नाहीत. मात्र, भाजपने प्रभू श्रीरामांवरून केलेला इव्हेंट बघता, प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करावे लागेल. यापुढे जय श्रीराम नाही, तर भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. श्रीरामाचे मुखवटे घालून फिरणाऱ्या रावणांचे मुखवटे काढायचे आहेत, असे खेडबोलही त्यांनी याप्रसंगी सुनावले. सातपूर येथे मंगळवारी पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray : श्रीरामांचा एक तरी गुण आहे काय?

आज ते श्रीरामांचे नाव घेतात, मात्र त्यांच्यात श्रीरामांचा एक तरी गुण आहे काय? प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते. मात्र, ज्या शिवसेनेने तुम्हाला अयोध्येपर्यंत पोहोचविले, त्या शिवसेनेचे वचन मोडणारे तुम्ही श्रीराम भक्त कसे होऊ शकता? कोणी तरी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. मात्र, शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले नसते, तर अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहू शकले नसते असे त्यांनी सांगितले.

त्यांचा राजकीय वध करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, माझ्या भगव्याशी, शिवसेनेशी प्रतारणा करणाऱ्या वालीचा राजकीय वध केल्याशिवाय राहणार नाही. मला वडिलोपार्जित शिवसैनिक मिळाले आहेत. चोरून मिळाले नाहीत. वर्षानुवर्षे शिवसेनेने खस्ता खाल्ल्या. मुंबईत जेव्हा दंगली पेटल्या, तेव्हा शिवसैनिक हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर होता. आज त्याच शिवसैनिकांना भ्रष्टाचारी ठरविले जात आहे. शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही दिल्ली गाठली. आता आमच्यावर आरोप करता. गरिबांना सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेत तुम्ही आठ हजार कोटींचा घोटाळा केला. मात्र, त्याविषयी प्रश्न विचारायचे नाहीत. जे जीवावर उदार होऊन कोरोनात लढले, त्या माझ्या शिवसैनिकांवर आरोप केले जात आहेत. 'ईडी'चा घरगड्याप्रमाणे वापर केला जात आहे, असे ते म्हणाले. व्यासपीठावर युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजन विचारे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, भास्कर जाधव, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अनिल परब, सुनील प्रभू आदी नेते उपस्थित होते.

आयते मिळालेले स्वातंत्र्य गिळताहेत

काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातो. मात्र, भाजपसोबत ३० वर्षे राहून आम्ही त्यांच्यासारखे झालो नाही, तर काँग्रेसची साथ दिल्याने काय फरक पडणार, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. जनसंघाने मुस्लिम लीगसोबत पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केल्याच्या घटनेला त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता, ना जनसंघ. आयते मिळालेले स्वातंत्र्य हे गिळायला निघाले आहेत. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करायची होती, तेव्हा स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्या मुस्लिम लीगसोबत श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी ११ महिने ते मंत्रिमंडळात मंत्री होते.

SCROLL FOR NEXT