नगर, पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाची चाचणी सुरू असताना रुळावर आलेल्या गायींना वाचवितांना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन ते चार दरम्यान घडली. या अपघातात एका गायीचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण डोह येथील पांडुरंग दौलत साठे (वय ७५) अहमदनगर तालुक्यातील नारायण डोह शिवारात नव्याने टाकण्यात आलेल्या रेल्वे ट्रॅकनजिक आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले असता हा अपघात घडला. गायी चरत चरत रेल्वे रुळावर आल्या असता चाचणी घेणारे इंजिन समोरून आले. त्यापासून आपल्या गायींना वाचविण्यासाठी पांडुरंग साठे पुढेे झाले, मात्र ते गायीला तर वाचवू शकले नाहीत, उलट त्यांनाही आपला जीव गमवावा लागला.
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब तापकीर यांनी या घटनेची माहिती दिली असून, पांडुरंग साठे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. संदेश कार्ले यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली.