पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दोनदा दौरा केला. पहिल्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला, मुंबई महापालिकेच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं. तर दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावर शिवसेना (ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासह भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अंधारे यांच्यावर पलटवार केला. (Maharashtra Politics)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात शिवसेना (ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केले होते. त्यांनी त्यामध्ये म्हंटलं होतं की,"शिवसेनेचे धास्ती घेऊन, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी निवडणुकीच्या तोंडावर सतत दिल्ली – मुंबई अपडाऊन करण्यापेक्षा मुंबईत एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घ्यायला हरकत नाही..! " या ट्विटसह त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता.
सुषमा अंधारे यांच्या ट्विटनंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी अंधारे यांना टॅग करत ट्विट केले होते. त्यांनी म्हंटल आहे की, "ताई, मला वाटत आपलं ज्ञान कमी आहे, थोडा अभ्यास केलात तर बरं होईल! महापालिका व सरकार लुटून फ्लॅट, प्रॉपर्टी, इस्टेट बनवण्याचे धंदे तुमचे नेते व युवराजांचेच आहेत. उगाच मुंबईत मातोश्री-२ उभा राहिलेले नाही. असो…"
प्रसाद लाड यांच्या ट्विटला रिट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. " विनाशकाले विपरीत बुद्धी. गरळ ओकायची म्हणजे किती त्याला काही मर्यादा? घरात 'बसून' राहणारे नाही आम्ही! आम्हाला जनतेत राहायला आवडतं, जनतेसोबत संवाद हाच आमचा परमोच्च आनंद! पण ज्यांचं सरकार कधी घराबाहेर पडलच नाही, त्यांची हे समजायची कुवतच नाही!!!" असं ट्विट करत त्यांनी निव्वळ मुर्खपणा असा हॅशटॅग दिला आहे. आता चित्रा वाघ यांच्या ट्विटला सुषमा अंधारे काय प्रत्त्युतर देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा