Latest

पुणे: रावणगाव अपघातातील मृत्युमुखी महिलांवर अंत्यसंस्कार

अमृता चौगुले

रावणगाव, पुढारी वृत्तसेवा: रावणगाव (ता. दौंड) येथे गुरुवारी (दि. 13) झालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली अपघातातील मयत तीन महिलांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत एकाच ठिकाणी शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच या महिलांवर काळाने घाला घातल्याने अनेकांना आपले अश्रू अनावरण झाले होते. सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊसाहेब पानसरे, अश्विनी प्रमोद आटोळे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर सहा महिलांना किरकोळ व गंभीर दुखापत झालेली आहे. त्यांच्यावर भिगवण, रावणगाव, दौंड येथील खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. सुरेखा व रेश्मा या सख्ख्या जावा असल्याने पानसरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातातील सर्वच महिला मागील पंधरा वर्षांपासून रावणगाव, खडकी, मळद, बोरीबेल, नंदादेवी या भागांतील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये रोजंदारी किंवा उकते काम करून शेतकर्‍यांच्या शेतातील कामांना प्राधान्य देत असल्याने त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या.

अपघाती घटनेनंतर घटनास्थळी व मृतांच्या घरी गुरुवारी व शुक्रवारी अनेकांनी भेट देऊन हळहळ व्यक्त केली. वरील सर्व महिला एकाच वस्तीवरील असल्याने परिसरात मोठा आक्रोश चालू होता. शुक्रवारी दिवसभरासाठी गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांना देखील शिक्षकांनी सुटी दिली होती.

SCROLL FOR NEXT