पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 नंतर ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे.सामन्यासाठी भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली असून त्यात विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. (WTC Final)
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या संभाव्य ११ खेळाडूंची निवड केली आहे. २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत भारताचे मुख्य प्रशिक्षक असलेले शास्त्री यांनी २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला त्याच्या संभाव्य ११ मध्ये स्थान दिले आहे. (WTC Final)
आयपीएल २०२३ आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये रहाणेचा फॉर्म पाहता निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली आहे. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने रहाणेला संघात स्थान देण्यात आले. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भारतीय संघाला नक्कीच जाणवेल, असा विश्वासही शास्त्री यांनी व्यक्त केला.
शास्त्री म्हणाले की, रहाणे ज्या प्रकारे चेंडूला टायमिंग करतो ते विलक्षण आहे. तो टी-२० क्रिकेटकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. त्याचे लक्ष अधिक धावा करण्यावर नसून जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवण्यावर आहे. रहाणे उत्कृष्ट स्ट्राईक रेटने धावा करत आहे. ही बाब भारतीय संघासाठी फायद्याची आहे.
पुढे ते म्हणाले, रहाणेने सांगितले आहे की जेव्हा तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता तेव्हा तुम्ही भारतीय संघातही पुनरागमन करू शकता. त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मागच्या वेळी भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली कारण तुमच्याकडे (भारत) जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल. अशी आशा शास्त्रींना आहे.
WTC फायनलसाठी रवी शास्त्रीची प्लेइिंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज