मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्यापासूनच महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून, दोन हजार गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ सरकारवर आली आहे. पुढील दोन महिन्यांत होणारी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने टँकर पुरवठा करण्याच्या जबाबदारीचे सर्वाधिकार तहसीलदारांना दिले आहेत. इतकेच नाही, तर आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपली तिजोरीही खुली ठेवली आहे.
राज्यातील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. राज्यातील सुमारे 1 हजार 582 गावे आणि 3 हजार 735 वाड्यांवर 1 हजार 997 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी याच दिवशी केवळ 70 गावे आणि 204 वाड्यांवर पाणीटंचाई होती; तर 75 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा मराठवाड्याला बसत आहेत.
जिल्हानिहाय टँकर संख्या
ठाणे 32, रायगड 15, रत्नागिरी 2, पालघर 30, नाशिक 238, धुळे 7, जळगाव 76, अहमदनगर 145, पुणे 98, सातारा 157, सांगली 95, सोलापूर 58, औरंगाबाद 443, जालना 336, बीड 154, नांदेड 3, धाराशिव 64, लातूर 8, अमरावती 3, बुलडाणा 32.