पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली: कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याच्या प्रकरणातील तक्रारदार व साक्षीदारांना योग्य ते संरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारला आवश्यक ते निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशा प्रकरणात आरोपींकडून आणि त्यांच्याशी संबंधित संघटनाकडून बदला घेण्याच्या भावनेने काम केले जाऊ शकते, त्यामुळे तक्रारदार आणि साक्षीदारांना योग्य संरक्षण मिळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता.
अशाच स्वरूपाची एक याचिका 2020 साली रद्दबातल करण्यात आली होती, असे सांगत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ याचिकाकर्त्याने ठराविक उदाहरण द्यावे, असे खंडपीठाकडून सांगण्यात आले.