कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना आज (दि. २) घडली. अपघाताची मालिका थांबता थांबायला तयार नाही. बकरी ईद सण साजरा करून मूळ गाव नांदेडहून मुंबईकडे जाताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चारचाकी (क्रमांक एम एच ०४ जे व्ही २४३०) डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पती पत्नीसह मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहम्मद जावीद अख्तर मोहम्मद सलिमोद्दिन (वय वर्ष 55), पत्नी शामीम बेगम मोहम्मद जावीद अख्तर (वय वर्ष 36) तर मुलगा आरकूमुद्दीन मोहम्मद जावीद अख्तर (वय वर्ष 23) असे मयत झालेल्यांची नावे आहेत.
रविवारी (दि. २) कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. सदरच्या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी येत पहाणी करत पुढील कारवाई करत आहेत.
सदरचे मृतदेह समृध्दी महामार्गावरील रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शववच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आहे, पुढील कारवाई तपास कोपरगाव तालुका पोलिस करत आहेत.