पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांनी १० जून १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यापुर्वी शरद पवार हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. शरद पवार यांच्या काँग्रस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली याला मोठी पार्श्वभूमी आहे.
राजीव गांधी यांच्या हत्या झाल्यानंतर काँग्रेस पक्ष गांधी घराण्याबाहेरील नेतृत्वात वाढला. पण १९९९ साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार या चर्चेने जोर धरला. सोनिया गांधी काँग्रेसचे नेतृत्व करणार यावरून विरोधीपक्षांनी जोरदार टीका करण्यास सुरूवात केली. सोनिया गांधीच्या विदेशीपणावरून काँग्रेस पक्षावर टीका करण्यात येऊ लागली. एप्रिल १९९९ मध्ये सोनिया गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यासाठी मोठी बैठक पार पडली.
या बैठकीत शरद पवार, तारिक अन्वर आणि पी.ए.संगमा यांनी विरोधक सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा निवडणूकीत आणतील आणि याचा फायदा विरोधातील पक्षांना होईल, असे मत मांडले. काँग्रेसच्या बैठकीत झालेली ही चर्चा माध्यमांपर्यंत पोहचली. शरद पवार, तारिक अन्वर आणि पी.ए.संगमा यांना सोनिया गांधी यांच्याविरोधात मत मांडल्याने पक्षातून काढून टाकण्यात आले.
शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकल्यानंतर तिघांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मुंबईत १० जून १९९९ ला काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. शरद पवार यांची काँग्रेस पक्षातून काढून टाकल्यानंतरही संयुक्त पुरोगामी आघाडी मध्ये दोन्ही पक्ष एकत्र राहिले. युपीए १ आणि युपीए २ च्या सरकारमध्ये शरद पवारांनी मंत्रीपदेही उपभोगली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर २०१४ ते २०१९ वगळता कायम सत्तेत राहिलेला पक्ष आहे. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा येऊनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यात आले. तर इतर गृह आणि अर्थ अशी महत्वाची मानली जाणारी खाती राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:कडे ठेवली होती.