सोलापूर ः राज्यात दूध व्यवसायाचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. शासनाने यावर तोडगा म्हणून दुधाच्या गुण प्रतीमध्ये बदल केला आहे. मात्र, दुधाच्या दराबाबत काहीच स्पष्ट केले नाही. शासनाच्या या भूमिकेवरून दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शुक्रवारपासून (8 डिसेंबर) शहराकडे होणारा दूध पुरवठा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शासनाने 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या गुण प्रतीचे दूध स्वीकारण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यामध्ये आता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक शेतकर्यांकडून आता 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ या गुण प्रतीचे दूध स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने उचललेले हे पाऊल सकारात्मक आहे. मात्र, हे करत असताना दूध दराबाबत मात्र काहीच स्पष्ट आदेश सरकारने दिले नाहीत. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.
सरकारने जाणूनबुजून दूध उत्पादक शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचे धोरण अवलंबले आहे. दूध दराच्या नियंत्रणासाठी नेमलेल्या दूध दर नियंत्रण समितीने दुधाला 34 रुपये प्रतिलिटर दर जाहीर केला होता. मात्र, सरकारच्या या निर्णयाला संघटित दूध संस्थांनी हरताळ फासला आहे. मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्याचे कारण देत या दूध संस्थांनी केवळ
25 ते 26 रुपये प्रतिलिटर या दराने दुधाची खरेदी सुरू केली आहे. शेतकर्यांच्याद़ृष्टीने दूध संस्थांना हा निर्णय घातक असाच आहे.
मागील वर्षी गायीच्या दुधाला जवळपास 35 ते 40 रुपये दर मिळत होता. त्यामुळे गायींची संख्या वाढविली आहे. पण, त्याचा पश्चात्ताप आता होत आहे. कारण आता केवळ 25 ते 26 रुपये प्रतिलिटर एवढा दर भेटत आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने दूध संस्थांना 40 रुपये दर देण्यास भाग पाडावे, अशी आमची मागणी आहे.
– धनाजी भोसले, दूध उत्पादक शेतकरी