नवी दिल्ली – पुढारी वृत्तसेवा – प. बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने 'दि केरला स्टोरी' चित्रपटावर घातलेल्या बंदीच्या विरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून निर्मात्यांच्या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तामिळनाडू व अन्य काही राज्यांमध्ये हा चित्रपट दाखविण्यास मनाई केली जात असल्याचा मुद्दाही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. चित्रपटावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बंदी घालण्याचे प्रकरण गंभीर असल्याने या मुद्यावर तात्काळ सुनावणी घेतली जावी, अशी विनंती ॲड. हरीश साळवे यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे केली. त्यावर शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल, असे चंद्रचूड यांनी नमूद केले. चित्रपटाचे निर्माते सनशाईन पिक्चर्स लिमिटेड व विपूल शहा यांनी ही याचिका दाखल केली आहे.