पुढारी ऑनलाइन डेस्क : Badrinath Dham : बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर आज बदरीनाथ धामचे दरवाजे देखील उघडण्यात आले. सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी आर्मी बँडच्या सुमधुर सुरांनी आणि भक्तांच्या जय बद्री विशालच्या गजरात बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बदरीनाथ मंदिराला 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.
बदरीनाथ धामला जमिनीवरील वैकुंठ असे म्हणतात. सध्या बदरीनाथ येथे कडाक्याची थंडी असून बर्फवृष्टी देखील होत आहे. तरीही हजारो भाविकांनी यावेळी दर्शनासाठी गर्दी केली. या प्रसंखी अखंड ज्योतीचे दर्शन करण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह होता. दरवाजे उघडल्यानंतर सुमारे 20 हजार यात्रेकरू धाममध्ये पोहोचले. दरवाजांच्या उद्घाटनासाठी माधव प्रसाद नौटियाल हेही टिहरी राजाचे प्रतिनिधी म्हणून धाममध्ये उपस्थित होते.
बदरीनाथ धाम हे चारधाम यात्रेतील एक प्रमुख तीर्थस्थल आहे. सध्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. बदरीनाथ यात्रेबाबत भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. यात्रेकरू आणि स्थानिक भाविकांची सुमारे 400 वाहने बदरीनाथला पोहोचली आहेत. बद्रीनाथसोबतच धाममध्ये असलेले प्राचीन मठ आणि मंदिरेही झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आली आहेत.
माना हे गाव बदरीनाथ पासून अगदीच जवळ आहे. बुधवारी बद्रीनाथ धामला पोहोचलेले बहुतांश भाविक माना गावात पोहोचले. दरम्यान माना गावात मोठी लगबग सुरू आहे. बद्रीनाथ येथील लष्कराच्या हेलिपॅडपासून मंदिर परिसरापर्यंत स्वच्छतेचे कामही पूर्ण झाले आहे. यावेळी बद्रीनाथ महामार्गावरील कांचन गंगा आणि राडांग बँडमध्ये हिमखंड वितळले आहेत. इथे अलकनंदेच्या काठावर काही ठिकाणी बर्फच आहे. नगर पंचायत बद्रीनाथच्या पर्यावरण मित्रांकडून स्वच्छ करण्यात येत असलेल्या बद्रीनाथ धामच्या अंतर्गत रस्त्यांवर अजूनही बर्फ आहे. २०१३ च्या आपत्तीत वाहून गेलेल्या लांबागड मार्केटमध्येही दुकाने सुरू झाली आहेत.