पुणे : पुढारी वृत्तसेवा : तो माजी सैनिक… तर ती गृहिणी… तो 70 वर्षांचा, तर ती 65 वर्षांची… राहायला एकाच घरात. मात्र, एकमेकांशी बोलायचे नाही… याखेरीज स्वयंपाकही स्वतंत्रपणे करून खायचे, अशा या ज्येष्ठ दाम्पत्याचा दावा लोकअदालतीत पाच वर्षांनी मिटला. समुपदेशानामध्ये उतारवयात दोघांना एकमेकांची गरज असल्याचे समजावून सांगण्यात आले. दोघांनी वाद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला अन् जाताना माजी सैनिक असलेल्या त्याने साश्रुनयनांनी न्यायाधीशांना सॅल्यूट केले. विराज आणि राजश्री (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. तो माजी सैनिक, तर ती गृहिणी आहे.
विराज हा व्यवस्थित पालनपोषण करीत नाही, असा राजश्रीचा आरोप होता. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून दोघांत वाद होता. यामुळे दोघे एकमेकांना बोलत नव्हते. अगदी स्वयंपाकही एकाच घरात वेगवेगळा करीत असत. दोघांतील वाद विकोपाला गेल्यामुळे तिने फेब्रुवारीमध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला. यात मेटेंनन्सही मागितला होता. हा दावा लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला. दोघांत यशस्वी समुपदेश झाले. त्याने दरमहा तिला आठ हजार रुपये द्यायचे, याशिवाय जमेल तसे पैसे द्यायचे आणि तिचा व्यवस्थित सांभाळ करण्याचे ठरले. विराजच्या वतीने न्यायालयात अॅड. सचिनकुमार गेलडा यांनी, तर राजश्रीच्या वतीने अॅड. अनिलकुमार जाधव यांनी बाजू मांडली.फ
उतारवयात दोघांना एकमेकांची गरज आहे. राहिलेले आयुष्य एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहण्याचे दोघांना समुपदेशनात सांगण्यात आले. दोघे एकमेकांतील वाद विसरले. नव्याने जगण्यास सुरुवात केली.
-अॅड. सचिनकुमार गेलडा आणि अॅड. अनिलकुमार जाधव