Latest

रुपेरी पडद्यावरचा तानाजी मालुसरे

Arun Patil

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच त्याची जादू आहे. आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.

शिवचरित्र हेच मुळात अखंड प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांना जिवाभावाचे, साथ देणारे आणि प्रसंगी प्राणांचे बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे त्यातील स्फूर्तिगाथा आहेत. जगाच्या इतिहासात 'गनिमी कावा' अजरामर करणारे हे मावळे म्हणजे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान. त्यातील एक लखलखतं नाव म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात राहणारा हा रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो आणि त्यांच्या सैन्याचा महत्त्वाचा भाग ठरतो.

महाराजांच्या ध्येयाशी तो इतका समरस होतो की, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून सिंहगडाची मोहीम अंगावर घेतो. या मोहिमेच्या यशासाठी तो जे जे काही करतो ते अद्भुत आणि विलक्षण असतं. या सगळ्यातून गड येतो पण सिंह जातो. आपला अमोल देह स्वराज्यचरणी अर्पण करीत तानाजी धारातीर्थी पडतो. मराठी म्हणवणार्‍या सर्वांना तोंडपाठ असलेली गोष्ट. पण तरीही आजवर या कथेची भुरळ कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी व्ही. शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाळे, ओम राऊत आणि आता दिग्पाल लांजेकर यांना पडलीय. प्रत्येकानं ही ऐतिहासिक कलाकृती भव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय.

बाबुराव पेंटर यांचा 'सिंहगड' (1922)

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंनी आपल्या देशात चित्रपट युगाला सुरुवात केली तेव्हा ते मूकपट होते. परंतु, त्यांचा चेहरा प्रामुख्याने पौराणिक होता. कलामहर्षी बाबुराव पेंटरांनी आपल्या 'सिंहगड' चित्रपटाद्वारे 1922 ला ऐतिहासिक चेहरा दिला. बाबुराव पेंटर यांनी 1922 साली 'सिंहगड' हा पहिला शिवचरित्रपर चित्रपट बनवला. चित्रपट मूक असल्यामुळे कथाविषय सर्वांना माहिती असेल, असाच हवा म्हणून कादंबरीकार ह. ना. आपटे यांची 1903 साली लिहिलेली 'गड आला पण सिंह गेला' ही सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी निवडली. बाबुरावांच्या या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. चित्रपटासाठी करमणूक कर लावण्याची पद्धत देशात रूढ झाली.

या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका बाबुराव पेंटर यांनी स्वतः केली. त्यांच्याबरोबर तानाजी मालुसरे यांची भूमिका बाळासाहेब यादव, उदयभानू म्हणून झुंजारराव पवार, तर शेलारमामा यांची भूमिका 23 वर्षांच्या व्ही. शांताराम यांनी केली होती. हा चित्रपट सिंहगडावर चित्रित करण्याचा बाबुराव पेंटरांचा मानस होता; पण पैशाअभावी पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यात आले. हातघाईच्या लढाईत तानाजी-सूर्याजी एकत्र दिसावेत यासाठी विशिष्ट तंत्र वापरून दिवाळीला लावण्यात येणार्‍या चंद्राज्योतीच्या दारूचा उपयोग केला तसेच प्रथमच 'स्किंग'ची पद्धत अमलात आणली.

'सिंहगड' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमागृहात हा चित्रपट सलग सोळा आठवडे चालला होता. बाबुरावांनी स्वत: रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी, उदयभानू, मावळे यांची भव्य पोस्टर्स लावली होती. ती पाहण्यास लोकांची एकच गर्दी उसळली होती. संपूर्ण मुंबईचे वातावरण शिवमय झाले होते. त्यावेळी नुकतीच हिंदू-मुस्लिम दंगल शमली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रख्यात मॅजेस्टिक टॉकिजने हा चित्रपट नाकारला होता. प्रचंड गर्दी पाहून नॉव्हेल्टीतल्या पहिल्या खेळाला पोलिसांना पाचारण केले होते. टायटल्स सुरू होत पडद्यांवर तानाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून हर हर महादेवसह दोघांच्या नावांच्या उत्स्फूर्त आरोळ्या सुरू झाल्या. उदयभानूच्या वाराने जेव्हा तानाजी कोसळतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. पुढे काही वर्षांनी लंडन येथे जागतिक प्रदर्शनात 'सिंहगड' हा चित्रपट दाखवला गेला, त्या वेळी परीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तिपत्रावर पुढील वाक्य आहे – This picture is an out standing example of sincerity of direction.

व्ही. शांताराम यांचा 'सिंहगड' (1933)

1933 मध्ये इंग्रजांविरुद्ध वातावरण पेटलेलं होतं. त्यामुळे स्वातंत्र्याचा मंत्र देणारा ऐतिहासिक 'सिंहगड' हा बोलपट काढण्याचे प्रभात फिल्म कंपनीने ठरवले. बाबुराव पेंटरांच्या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी शेलारमामांची भूमिका केली होती. पण यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पडद्याआड ठेवले. या नव्या सिनेमात शंकराराव भोसले यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका, तर कमलकुमारी (लीला चंद्रगिरी), देवलदेवीची (प्रभावती), छत्रपती शिवाजी महाराज (गणपत शिंदे), उदयभानू (बाबुराव पेंढारकर), बुवासाहेब (घेरे-सरनाईक), मा. विनायक (जगतसिंह), केशवराव धायबर (शेलारमामा) यांनी अविस्मरणीय भूमिका केल्या.

या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम यांनी नेहमीच्या रुळलेल्या चाकोरीतून न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने अनेक द़ृश्ये चित्रित केली. रात्रीच्या लढाईचा प्रसंग चित्रित करताना त्यांनी, अंधारात दोन्ही पक्षांचे तुंबळ युद्ध चालू असताना तोफा डागायचे ठरवले. तोफांतून एका पाठोपाठ एक याप्रकारे गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडेल, त्या प्रकाशात युद्धाचा प्रकाश आणि काळोख असा फार गमतीचा खेळ पडद्यावर दिसत होता. ही द़ृश्ये या चित्रपटाची प्रमुख आकर्षण ठरली. पोवाडा हा प्रकार या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर आला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा जोरात सुरू होता. त्याचवेळी या चित्रपटातून लहरी हैदर यांनी रचलेला पोवाडा 'चल ऊठ गड्या, चल वीर गड्या, घेऊन भाला, ढाल गड्या, शूर शिपाई

शिवाजीचा तू, मर्द मराठा मावळचा' या वीरश्रीयुक्त पोवाड्याने जनक्षोभ अधिक उसळत असे. गोविंदराव टेबे यांनी अत्यंत जोशपूर्ण संवाद लिहून अभिनय आणि संगीताप्रमाणे चित्रपटासाठी लेखणीचं कसब सिद्ध केलं. जुन्या जमान्यातील हा चित्रपट, त्या वेळी विजेच्या दिव्यावर किंवा बंदिस्त साऊंड प्रूफ स्टुडिओत चित्रीकरण होत नसे. चित्रपट म्हणावा तेवढा गतिमान झाला नव्हता, तरीही त्या काळी 'सिंहगड' प्रचंड गाजला आणि त्यातून प्रभातच्या चालकांना पुढचे रंगीत चित्रपट निर्माण करण्याची उमेद मिळाली.

गबाले यांचा 'नरवीर तानाजी' (1952)

मुंबईच्या कोहिनूर टॉकिजचे मालक श्री. कान्हेरे यांनी एक ऐतिहासिक चित्रपट करायचे ठरवले. साहजिकच, शिवरायांचा पराक्रमी शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हा विषय त्यांनी निवडून बाबुराव पैलवान (तानाजी मालुसरे), मा. विठ्ठल (छत्रपती शिवाजी महाराज), दुर्गाबाई खोटे (जिजामाता), रायबा (मदनमोहन), शेलारमामा (केशवराव धायबर) यांच्याबरोबर नायिका सुलोचना, वसंतराव पैलवान असा कलाकारांचा संच निवडला. बाबुरावांचे व्यक्तिमत्त्व रांगडे होते. त्यांची पैलवानी देहयष्टी तानाजीच्या भूमिकेला शोभून दिसणारी होती; पण मराठी संवाद बोलण्याची त्यांची बोंब होती. या चित्रपटातील त्यांचे सारे संवाद प्रख्यात गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या आवाजात डब केले गेले. दिग्दर्शक म्हणून राम गबाले यांनी ऐतिहासिक चित्रपट केला नव्हता. यात लढाया, कुस्त्या, वाघाशी झुंज, दांडपट्ट्याने हत्तीची सोंड छाटणे असे प्रसंग चित्रित करायचे होते.

लढाईसाठी आणलेला हत्ती पिसाळला

भगवानदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरणाला सुरुवात झाली. हत्तीची सोंड कापण्याच्या प्रसंगासाठी हत्ती पाहिजे होता. ग. दि. माडगूळकर यांच्या ओळखीने औंध संस्थानचा हत्ती मिळाला. हत्ती व्ही.आय.पी. असल्याने त्याचं खाणं-पिणं, राहणं आणि माहुताची बडदास्त ठेवली गेली होती. स्टुडिओमध्येच उदयभानूच्या वाड्याचा मोठा सेट उभारला होता.

रात्रीचा सीन होता. लढाई चालू असताना तानाजी दांडपट्टा चालवीत सपासप शत्रूसैन्य कापत हटवत येतो. लढाई अगदी निकरावर आल्यावर उदयभानू हत्तीवर स्वार होऊन तानाजीच्या दिशेने अंगावर येत असताना तानाजी हत्तीची सोंड हातात धरून कापतो. खरे तर तो प्रसंग अवघड होता. त्या काळात आतासारखी स्पेशल इफेक्टची सोय नव्हती. त्यामुळे ट्रकच्या टायरची ट्यूब कापून सोंडेसारखी हत्तीच्या सोंडेला दुमडून बांधली होती.

सर्व तयारी झाली. माहूत त्याच्या भाषेत हत्तीला चुचकारत होता. हत्तीनं पळत येणं आणि तानाजीने सुरक्षित अंतरापर्यंत दांडपट्टा फिरवीत जाणे, एवढाच शॉट हवा होता. सर्व तयारी झाली. तानाजी ठरलेल्या अंतरापर्यंत आला आणि हत्तीने एकदम रागावून 'हे काय बांधलंय' या भावनेने पक्की बांधलेली इनर ट्यूब रागाने उडवून टाकली आणि नासधूस करू लागला.

दुसरा प्रसंग तानाजी जंगलात वाघाशी सामना करतो, असा होता. त्यासाठी शिकाऊ वाघ कुठे मिळेल तिथे जायचं ठरलं. पंढरपूरच्या सर्कशीत असा वाघ आहे, असे समजल्यानंतर चित्रपटाचा चमू तिकडे गेला. एका बंदिस्त धर्मशाळेत झाडांच्या फांद्या, मोठमोठे दगड लावून जंगलाचा देखावा उभा करून सेट उभारला.

वाघाच्या रिंगमास्टरला तानाजीसारखे केस, भरदार मिशा, कपडे, डोक्यावर मराठेशाही पगडी वगैरे वेशभूषा करून तयार ठेवला. वाघाचे स्वतंत्र आणि एकत्र शॉट्स घ्यायची योजना पक्की केली. कॅमेराच्या लेन्सपुरती मोकळी जागा ठेवून डुप्लिकेट तानाजी आत सोडला. वाघाने रिंगमास्टरला आवाजावरून ओळखले; परंतु आपला हा रोजचा भिडू, आज हे काय करून आलाय म्हणून वाघाने डरकाळी फोडत त्याची पगडी आणि केसांचा विग उडवून दिला.

पुढे मात्र बाबुराव पैलवानांच्या सोबत हवे तसे शॉट्स चित्रित झाले. चित्रीकरण संपल्यानंतर सर्कशीच्या चमूला एक ग्रुप फोटो काढायचा होत. वाघ मध्ये आणि त्याच्या बाजूला तो रिंगमास्टर उभा राहिला. नेहमी फोटोमध्ये मध्यभागी महत्त्वाच्या जागी उभे राहणारे मान्यवर यावेळी मात्र फोटोत दूर दूर उभे राहिले. हा चित्रपटसुद्धा भरपूर चालला.

'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' (2020)

'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!' अशा दमदार डायलॉगसह 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा हिंदी बहुचर्चित चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित करण्यात आला. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवली होती. अंगावर शहारे आणणारी द़ृश्ये चित्रपटात साकारण्यात आली. तानाजींचे जीवन आणि त्यांनी मुघलांवर मिळवलेला विजय थ्रीडी प्रसंगांतून 70 एमएम पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री काजोलने तानाजींच्या पत्नीची-सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना कपाळी ठसठशीत कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर आणि करारी नजर अशा तिच्या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक झाले होते.

अभिनेता शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तर कोंढाण्याचा अधिकारी असणार्‍या उदयभानू राठोडची भूमिका सैफ अली खान याने केली. 150 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले होते.

सिनेमाविषयी बोलताना अजय देवगण म्हणाले होते की, भारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणार्‍या तानाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतोय. मला ही कथा देशाच्या नव्हे, तर जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचलेली पाहायचीय. पुढं तसंच घडलं. देशभरात सर्व भाषिकांनी या चित्रपटाचं तुफान स्वागत केलं. त्यामुळे या चित्रपटानं 300 करोडहून अधिक कमाई केली होती.

लांजेकर यांचा 'सुभेदार'(2023)

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा असलेला 'सुभेदार' चित्रपट 25 ऑगस्ट 2023 ला चित्रपटगृहांत झळकला. या सिनेमानं गेल्या पाच दिवसांत जवळपास 6.48 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मोजके शोज आणि बॉलीवूड चित्रपटांकडून तगडी टक्कर असतानाही 'सुभेदार'ने केलेली कमाई कौतुकास्पद आहे.

यासंदर्भात लांजेकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले, तानाजी मालुसरे यांच्या कथेशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. पण तानाजी म्हणजे केवळ सिंहगडावरची लढाई नव्हे, तर ते छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. कोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वात मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सैन्याबद्दलचा अभ्यास यांसारख्या बारीकसारीक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकला आहे.

इतिहास मांडताना तो भव्यदिव्य तर दाखवायचा, प्रेक्षकांच्या काळजालाही भिडवायचा होता. त्याद़ृष्टीने कथा, सादरीकरण, ऐतिहासिक संदर्भ, त्या काळातील भाषा, शस्त्रास्त्रे, वेशभूषेपासून अगदी अजय पुरकर यांचा अभिनयापर्यंत, मावळ प्रांतातील भाषा याचा वापर केलाय. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, मृणाल कुलकर्णी जिजाऊसाहेब, स्वतः दिग्पाल बहिर्जी नाईक असे कलाकार भूमिकेत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजय पूरकर तानाजी मालुसरे शोभले आहेत. केवळ नजरेने एखाद्याला गारद करण्याची ताकद तानाजींमध्ये होती. या सगळ्या पात्रनिवडीतून इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेलाय.

हे पाचही सिनेमे पाहिले, तरी एक गोष्ट सतत मनाला जाणवत राहते. हे शेवटी सिनेमे आहेत. तानाजी मालुसरे ही एक व्यक्ती नव्हती. तो एक जिवंत इतिहास होता. या इतिहासाकडे प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून पाहणार आहे. त्यामुळे तो प्रत्येकाला वेगळा दिसणार आहे. हा इतिहास जमेल तेवढा समजून घेऊनच, हे सिनेमे पाहायला हवेत म्हणजे इतिहास आणि सिनेमा यातील गल्लत टाळता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT