पुढारी ऑनलाईन डेस्क : गेली दोन दिवस तामिळनाडू राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पाऊस आणि पुरामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे 800 प्रवासी तिरुचेंदूर आणि तिरुनेलवेली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना स्थानिक जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. (Tamil Nadu Floods Situation)
तमिळनाडूच्या किनारी भागात केप कोमारिनमध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अनेक नद्या आणि तलाव ओसंडून वाहत आहेत. पूरस्थिती पाहता कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तुतीकोरीन आणि तेनकासी येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासात सुमारे 670 मिमी आणि 932 मिमी पावसामुळे तिरुनेलवेली आणि तुतीकोरीन जिल्ह्यात रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानके जलमय झाली आहेत. सुमारे 800 प्रवासी तिरुचेंदूर आणि तिरुनेलवेली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांना स्थानिक जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. दोन टीम अडकलेल्या रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, असे एनडीआरएफने म्हटले आहे.
तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यात रविवारी अनेक ठिकाणी ५२५ मिमी पाऊस झाला. थुथुकुडीमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजाने पुरामुळे त्रस्त लोकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूरग्रस्त भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकिटे आणि इतर आवश्यक वस्तू टाकल्या जात आहेत.
हवामान खात्याने म्हटले आहे की तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारीही हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. चेन्नई हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील तीन तासांत तामिळनाडूच्या कराईकल आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. मुसळधार पावसाची अपेक्षा असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुदुकोट्टई, तंजावर, तिरुवर, नागापट्टिनम, रामनाथपुरम आणि शिवगंगाई यांचा समावेश आहे. थेनी, तेनकासी, कन्याकुमारी, थिरुनेलवेली, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले असून, या नैसर्गिक आपत्तीत विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झालाआहे. दरम्यान, आज ( दि. १९) चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.राज्यपाल आरएन रवी आढावा बैठक घेणार आहेत.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील सर्वात जास्त प्रभावित असलेल्या कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे बेपत्ता आहेत. उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण तामिळनाडूमधील तब्बल 39 प्रदेशांमध्ये अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाने स्पष्टकेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती, रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून अनेक निवासी वसाहती पाण्याखाली आल्या आहेत. तलावांना तडे गेल्याने आणि पूर आल्याने अनेक भागातील रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी मोबाईल फोन सेवाही विस्कळीत झाली आहे.