पुढारी ऑनलाईन डेस्क :
अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केलेल्या तालिबान्यांनी आता आपला खरा चेहरा भारताला दाखविण्यास सुरुवात केली आहे. तालिबान्यांनी लष्करी तुकडीचे पानिपत नाव ठेवले ( Taliban army unit ) असून, या माध्यमातून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काबुलमधील 'अमाज न्यूज'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, या निर्णयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीयांनी तालिबान्यांना चांगलेच फटकारले आहे. "तुमच्या देशातील नागिरांकाच्या जगण्याचा स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न करा. अशा हास्यास्पद गोष्टींना भारताकडून प्रतिसाद मिळणार नाही", अशा शब्दात अनेक भारतीयांनी आपल्या संतापाला वाट करुन दिली आहे.
काबूलमधील अमाज न्यूजमधील वृत्तात म्हटलं आहे की, तालिबानने अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांत लष्कराच्या एका युनिटची स्थापना केली आहे. हा प्रांत पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. या तुकडीतील जवानांच्या हातात रायफल आहेत. या युनिटचे नाव पानिपत ठेवण्यात आले आहे.
तालिबानी सरकारने भारताला डिवचण्यासाठी केलेल्या उद्योगाविरोधात सोशल मीडियातून भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहेच. त्याचबराेबर काही अफगाणिस्तानच्या नागरिकांनीही तालिबान्यांची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर एका अफगाण नागरिकाने म्हटले आहे की, "असे नाव देणे हा प्रकारच मजेशीर आहे. मला माहित आहे की, पाकिस्तानमधून आलेल्या आदेशानुसारच अशा पद्धतीचे नाव ठेवण्यात आले आहे. कारण पाकिस्तानचा भारताबरोबर संघर्ष सुरु आहे".
अनेकांनी भारतीयांनी सोशल मीडियावर तालिबान्यांना खडेबोल सुनावले आहेत. भारताचा तिरस्कार करत असल्यानेच तालिबान्यांनी फाजील देशाभिमान दाखवला असल्याची टीका अनेकांनी केली आहे. अनेक भारतीयांनी तालिबान्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. आधी अफगाणिस्तानी नागरिकांना चांगलं जीवनमान देण्यासाठी प्रयत्न करा, असा फाजील देशाभिमान दाखवणं हे तालिबान्यांसाठी नवे नाही, असल्या गोष्टींना भारतीय परराष्ट्र मंत्रालय कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, तुमच्या या हस्यास्पद गोष्टींना भारताकडून प्रतिसादमिळणार नाही, अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीयांनी आपल्या संतापाला वाट करुन दिली आहे.
हेही वाचलं का?