पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गोळीबाराची या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कायद्या सुव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule On Ghosalkar Firing)
फेसबुक लाईव्ह सुरु असताना मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली. नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ आहे. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केला आहे. (Supriya Sule On Ghosalkar Firing)
खासदार सुळे म्हणाल्या, अशा पद्धतीने राज्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खून पडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. (Supriya Sule On Ghosalkar Firing)
हेही वाचा