कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचाही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व 48 जागा जिंकण्याचे महायुतीचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या बैठकीत लोकसभा एकत्रित लढवण्याचा निर्णय झाल्याचे सांगत तटकरे म्हणाले, जहाल विचारसरणी असणार्या शिवसेनेसोबत काँग्रेस गेली. राजकारणात हे अपरिहार्य आहे. आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. निवडणूक आयोगाकडेही भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादीला 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती. पण पक्षाने ती का घेतली नाही, हे समजले नाही. मात्र, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची अपेक्षा आहे, असे तटकरे म्हणाले. दुष्काळाच्या भूमिकेपासून राज्य सरकार दूर नाही. ते शेतकर्यांप्रती संवेदनशील आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, कायदेशीर अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही भूमिका राष्ट्रवादीने मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.