Latest

ऊस उत्पादकांच्या बिलातून वाढीव पाणीपट्टीची कपात नाही : सत्यशिल शेरकर

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : कुकडी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी दरामध्ये सहापटीने भरमसाठ अशी दरवाढ केली आहे. या पाणीपट्टीची रक्कम ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून कपात करून मिळण्याबाबत त्यांनी कारखान्यास कळविले आहे. मात्र, वाढीव दराने आकारलेल्या पाणीपट्टीची वसुली शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केली जाणार नाही. याबाबतचे माहिती अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ नारायणगावचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले असल्याची माहिती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.

कुकडी पाटबंधारे विभागास दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी ऊस उत्पादकांचे संमतीपत्रानुसार विघ्नहर कारखाना पाटबंधारे विभागाने कळविलेल्या वसुली यादीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिलातून रक्कम कपात करून ती रक्कम विघ्नहरने वेळोवेळी शासनास अदा केली आहे. परंतु या वर्षीच्या हंगामापासून पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीचे दरामध्ये केलेल्या भरमसाठ वाढीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शेतीच्या खर्चामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तसेच कांदा निर्यात शुल्कामध्ये केलेली वाढ व निर्यातबंदी, सोयाबीनची आयात, साखर निर्यातबंदी या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये आधीच खूप घट झाली आहे. त्यामध्ये पाणीपट्टी दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या सर्व बाबींचा विचार करून विघ्नहर कारखान्याने वाढीव पाणीपट्टी दरवाढीनुसार शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.शासनाकडून जुन्या दराप्रमाणे पाणीपट्टी वसुलीची यादी विघ्नहर कारखान्यास आल्यास त्याप्रमाणे ऊस उत्पादकांचे ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम वसुली करण्यास कारखाना सहकार्य करील, असेदेखील अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT