Latest

Landing of Vikram Lander : विक्रम लँडरची यशस्वी लँडिंग, केंद्रीय मंत्र्यांच्या शुभेच्छा

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चांद्रयान मिशनच्या यशाने अवघ्या देशाची मान जगभरात उंचावली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करणारे भारत हे पहिले राष्ट्र ठरले आहे. नवीन स्पेस क्षेत्रातील साहसीपूर्ण प्रदीर्घ प्रवास भारताच्या खगोलीय महत्वाकांक्षांना नवीन उंचीवर नेणारे आहे, अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. भारतीय कंपन्यांसाठी अंतराळातील प्रवेशद्वार उघडल्याने देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगमुळे, भारताने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय जोडला आहे. १४० कोटी भारतीयांसाठी ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आणि ऐतिहासिक क्षण आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश बनला आहे.  हे यश अंतराळ तंत्रज्ञानातील भारताच्या क्षमता आणि सामर्थ्याची साक्ष आहे, अशी भावना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
अंतराळात भारताच्या यशाने आता अभूतपूर्व उंची गाठली आहे. ज्या शास्त्रज्ञांनी आपल्या बुद्धिमत्तेने, कठोर परिश्रमाने आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हे मिशन यशस्वी करून इतिहास रचला त्या शास्त्रज्ञांचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे, असे सिंह म्हणाले.
इस्रोचे अतूट समर्पण, सूक्ष्म नियोजन आणि टीमवर्कमुळे भारताने अवकाश संशोधनातील पराक्रम पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असलेल्या या ऐतिहासिक कामगिरी बद्दल भारतीय नागरिकांचे अभिनंदन, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT