कासा : निलेश कासट ; पारंपरिक भात शेतीबरोबरच आता व्यावसायीक दृष्टीकोनातून प्रायोगिक शेतीतून अन्य कृषी उत्पन्न वाढवण्यावर शेतकरी भर देत आहे. डहाणू तालुक्यातील वेती वरोती ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सहा शेतकर्यांनी प्रत्येकी चार ते पाच गुंठ्यात स्ट्रॉबेरीची पिकाची लागवड केली असून यासाठी त्यांनी रासायनिक खताचा वापर न शेणखत व गांडूळ खत सेंद्रिय खतांचा वापर करून स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनही चांगले होत असून मागणीही वाढलेली आहे.
येथील प्रयोगशील शेतकरी कैलास बसवत हे कृषी अभ्यासक असून नेहमी गावातील शेतकर्यांसोबत शेतीविषयक मार्गदर्शन करीत विविध प्रयोग करीत असतात यावर्षी स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचे ठरवले. स्ट्रॉबेरी ही फक्त थंड हवेच्या ठिकाणी होते असा नागरिकांचा समज आहे तो समज दूर केला गेला शेतकर्यांनी परिश्रम,जिद्द ठेवून व विविध प्रयोगशील राहिले तर नक्कीच उत्पादन वाढू शकते, हे वेती वरोती येथील शेतकर्यांनी दाखवून दिले .या भागात नेहमी धामणी व सूर्या धरणाच्या कालव्यातून पाणी वाहत असते त्यामुळे येथील वातावरण नेहमी थंड असते. त्यामुळे येथे स्ट्रॉबेरीची लागवड केली असल्याची बसवत यांनी सांगितले.
या शेतकर्याने हिमाचल प्रदेश मधून स्ट्रॉबेरीची प्रत्येक रोप प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे मागवली .यासाठी कृषी विभागाचे तसेच पंचायत समिती तसेच कोसबाड येथील कृषी केंद्राचे मार्गदर्शन घेतले .प्रायोगिक तत्त्वावरील स्ट्रॉबेरी शेती सध्या छान फुलली असून सध्या दहा दिवसात दहा ते वीस किलो स्ट्रॉबेरी काढली जात असून पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी खरेदी करत आहेत त्यात सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यामुळे यांची चव देखील खूप सुंदर आहे.
दरवर्षी येथील शेतकरी भातशेती करतात. तसेच विविध भाजीपाला लागवड केली जाते. सध्या येथील वातावरण थंड असल्याने स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय खतांचा वापर केल्याने स्ट्रॉबेरी पिक चांगले मिळत आहे.
-कैलास बसवत, प्रयोगशील शेतकरी वेती