कोलंबो ; वृत्तसंस्था : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी रविवारी राजीनामा दिला. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुुपूर्द केला. मात्र तो अद्यापही स्वीकारण्यात आला नसल्याचे कळते. दरम्यान, देशभरात आणीबाणी आणि संचारबंदीनंतरही हिंसक निदर्शने सुरूच आहेत.
श्रीलंकेतील अभूतपूर्व संकटानंतर देशात आणीबाणी पुकारण्यात आली. सरकारविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनानंतरही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाने राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
देशातील मुख्य विरोधी पक्षातर्फे रविवारी डिपेंडन्स स्क्वेअरवर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व करणारे साजिथ प्रेमदासा म्हणाले की, जनतेला विरोध प्रकट करण्याचा अधिकारापासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नांविरोधात आम्ही हा मोर्चा काढला आहे. एका खासदाराने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मध्य श्रीलंकेत निदर्शने करणार्या शेकडो नागरिकांवर अश्रुधुराचा मारा केला.