पुढारी ऑनलाइन डेस्क : "नाटू नाटू" गाण्यातील नृत्य द. कोरियामध्ये खरोखरच लोकप्रिय आहे. मी स्वतः चित्रपट पाहिला आहे, तो एक फॅन्टॅस्टिक चित्रपट आहे. मला बॉलिवूड चित्रपट आवडतात. मी 3 इडियट्स पाहिला आणि शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस हा देखील माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे, अशा स्तूती सुमनांचा वर्षाव दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री पार्क जिन यांनी केला आहे.
दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री पार्क जिन (Park Jin) 7 आणि 8 एप्रिल रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते आज नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. दिल्लीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात ते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतील. नंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी हैदराबाद हाऊस येथे चर्चा करणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते चेन्नईतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून तेथून ते पुन्हा दक्षिण कोरियाला रवाना होतील.
पार्क Park Jin यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, G20 देशांच्या सदस्यांच्या विविध हितसंबंधांमध्ये समन्वय साधण्याची आणि जी-20 मध्ये नसलेल्या इतर देशांच्या आवाजात समन्वय साधण्याची भारताची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. कोरियाला भारतासोबत एकत्र काम करण्यास खूप आनंद होईल.
पार्क Park Jin यांची भेट घेतल्यानंतर उपराषट्रपती जगदीप म्हणाले, भारत-कोरिया प्रजासत्ताक विशेष धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंधांचे महत्त्व यावर चर्चा केली जाणार आहे.
पार्क जिन यांनी घेतली परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट
राजधानी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केल्यानंतर दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री पार्क जिन हे त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार हैदराबाद येथे दाखल झाले. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जयशंकर म्हणाले, "दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्री पार्क जिन यांच्या भारताच्या पहिल्या अधिकृत भेटीवर स्वागत करताना आनंद झाला. आजची आमची चर्चा आमची विशेष धोरणात्मक भागीदारी पुढे नेईल," EAM डॉ. एस जयशंकर यांनी ट्विट केले.
भारत आणि दक्षिण कोरिया एकाच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, तर कोरिया 1945 मध्ये जपानच्या तावडीतून मुक्त झाला. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने बिनशर्त शरणागतीची घोषणा केली. यानंतर कोरियाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झाले. मे 1948 मध्ये दक्षिण कोरियामध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
ही निवडणूक संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली पार पडली. यासाठी, 9 सदस्यीय यूएन टेम्पररी कमिशन ऑन कोरिया (UNTCOK) स्थापन करण्यात आले, ज्याचे अध्यक्ष स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र सचिव के.पी. एस. मेनन होते. कोरियाची पहिली निवडणूक शांततेत पार पाडताना के.पी. एस. मेनन यांची विशेष भूमिका आहे. आपण असे म्हणू शकतो की दक्षिण कोरियाचे पहिले लोकशाही सरकार स्थापन करण्यात भारताने खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. 15 ऑगस्ट 1948 रोजी दक्षिण कोरियामध्ये पहिले निर्वाचित सरकार स्थापन झाले.