नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मराठी भाषेचे धिंडवडे काढणाऱ्या रेल्वे विभागाविरोधात भाषा प्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये झळकणाऱ्या भाषांतरित मराठीतील सूचनांमुळे भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. आता यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशींनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी भाषेचा असा अवमान करणारा व अतिशय चुकीचा असा मराठी भाषेचा वापर रेल्वे विभागाने तत्काळ थांबवण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांच्या सर्व विभागांमधून सर्व स्तरावरील कार्यालयात, हिंदी कक्ष व हिंदी अधिकारी असतात, त्या प्रमाणे मराठी भाषा कक्ष आणि मराठी भाषा अधिकारी नेमले जावेत अशी मागणी पुन्हा एकदा जोशी यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.पत्रातून त्यांनी मराठी भाषिकांमध्ये व्याप्त असलेल्या असंतोष रेल्वेमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला.
मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवासी सुविधा अंतर्गत डब्यांमध्ये फलक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या स्क्रीनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुचना देण्यात येतात. त्याचबरोबर पुढील स्थानक, गाडीचा वेग, अंतिम स्थानक अशी माहिती दिली जाते. पंरतु, हिंदी आणि इंग्रजीमधील सूचनांचे इंटरनेटवरील पर्यायातून भाषांतर करण्यात आले आहे. यामध्ये 'तुमचा प्रवास सुखाचा आणि सोयीचा हो ही भारतीय रेल्वेची शुभेच्छा' कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे', 'तुमची आपली वस्तू एका बाजूला ठेवू नये' अशा सुचना स्क्रीनवर झळकल्याने मराठी भाषा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.